आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठलभक्तांसाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. वारीच्या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन २२ ते २९ जुलै २०२६ दरम्यान पंढरपूर आणि मिरजसाठी ५४ विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामध्ये आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांचा समावेश असून, यामुळे राज्यातील विविध भागांतील वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
पुणे रेल्वे विभागाने आषाढी वारीसाठी पुणे-मिरज-पुणे विशेष गाडी २३ ते २९ जुलै दरम्यान दररोज चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पुण्यातून सकाळी ८.४० वाजता सुटेल आणि सायंकाळी ६.४५ वाजता मिरज येथे पोहोचेल. तर मिरज येथून पुण्यासाठी ही गाडी रात्री ९.३० वाजता सुटेल. या प्रवासात गाडीला हडपसर, उरुळी, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड आणि साळगरे यांसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
२० आरक्षित विशेष गाड्यांच्या फेऱ्या
गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वेने २० आरक्षित विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर-मिरज (४ फेऱ्या), नवीन अमरावती-पंढरपूर (४ फेऱ्या), खामगाव-पंढरपूर (४ फेऱ्या) आणि लातूर-पंढरपूर (८ फेऱ्या) यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांसाठीचे तिकीट बुकिंग १ जुलैपासून रेल्वेच्या संगणकीकृत केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
३४ अनारक्षित गाड्यांची सोय
सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेकडून ३४ अनारक्षित फेऱ्या देखील चालवल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर-कुर्डूवाडी (१६ फेऱ्या), पुणे-मिरज (१४ फेऱ्या) आणि भुसावळ-पंढरपूर (४ फेऱ्या) यांचा समावेश आहे. या गाड्यांसाठी प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांशिवाय 'यूटीएस' (UTS) मोबाईल ॲपद्वारे थेट तिकिटे खरेदी करता येणार आहेत.
मानाच्या दिंड्यांना २० हजारांचे अनुदान
रेल्वे सुविधांसोबतच राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या १० पालख्यांमधील सुमारे १४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा आदेश २ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या अनुदानासाठी २ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, यामुळे वारीदरम्यान वारकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.