IND vs NZ 1st T20I: आयपीएलमध्ये फक्त 10 सामने खेळून संधी मिळाली, Venkatesh Iyer चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
व्यंकटेश अय्यर (Photo Credit: PTI)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात जयपूरच्या (Jaipur) सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर पहिला टी-20 सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. व्यंकटेश अय्यरने 20 सप्टेंबर 2021 रोजी आयपीएलमध्ये पदार्पण केले. कोलकाता नाईट रायडर्सकडून  (Kolkata Knight Riders) खेळणारा व्यंकटेश अय्यर धोकादायक फलंदाजी आणि घातक गोलंदाजीत माहिर आहे. केकेआरला (KKR) आयपीएल (IPL) 2021 च्या अंतिम फेरीत नेण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. युएई आवृत्तीच्या स्पर्धेत अय्यरने 10 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांसह एकूण 370 धावा चोपल्या तर जर आपण गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने इंडियन प्रीमियर लीग 2021 मध्ये 3 विकेट्सही घेतल्या. (IND vs NZ 1st T20I 2021: रोहित शर्माने जिंकला टॉस, न्यूझीलंडला दिले फलंदाजीचे आमंत्रण; भारतीय XI मध्ये धाकड अष्टपैलूचे पदार्पण)

आयपीएल 2021 व्यतिरिक्त अय्यरने यापूर्वी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी मधेही चमकदार कामगिरी केली होती. डाव्या हाताने फलंदाजी करण्याबरोबरच तो उजव्या हाताने वेगवान गोलंदाजीही करतो. अशा परिस्थितीत तो किवींविरुद्ध मालिकेत अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याची उणीव तो दूर करू शकतो. मध्य प्रदेशच्या 26 वर्षीय व्यंकटेश अय्यरने आयपीएल 2021 मध्ये चांगली कामगिरी केली. टी-20 लीगदरम्यान तो ओपनिंग करताना दिसला होता. पण न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाकडे रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या रूपाने चांगले सलामीवीर आहेत. अशा स्थितीत त्याला शेवटच्या षटकांमध्ये फिनिशर म्हणून फलंदाजीची संधी मिळेल. उल्लेखनीय आहे की अय्यरने प्रथमच टी-20 लीगमध्‍ये प्रवेश केला. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 128 होता. 29 धावांत 2 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. आयपीएलनंतर व्यंकटेश अय्यरची दमदार कामगिरी मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही कायम राहिली. त्याने 5 डावात 52 च्या सरासरीने 155 धावा केल्या. तसेच अर्धशतकही ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 141 होता, जो टी-20 च्या दृष्टीने उत्कृष्ट आहे. तिथे गोलंदाजी करताना त्याने 17 च्या सरासरीने 5 विकेट घेतल्या. तसेच बिहारविरुद्ध सामन्यात त्याने 4 षटकात केवळ 2 धावा देत 2 विकेट घेतल्या.

दुसरीकडे, भारत-न्यूझीलंड सामन्याबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने फक्त 6 सामने जिंकले आहेत. विक्रमांच्या बाबतीत, किवींनी भारतीय संघाला मागे टाकले आहे आणि नऊ सामने जिंकले आहेत, दोन सामने अनिर्णित आणि एक रद्द झाला आहे.