COVID-19 लॉकडाउनमुळे घर बसलेत टीम इंडियाचे खेळाडू, कोच रवि शास्त्री यांना दिसत आहे यात फायदा, जाणून घ्या कसे
रवि शास्त्री (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लढाईसाठी भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडणे शक्य होत नाही. कोरोनामुळे बर्‍याच क्रीडा स्पर्धा एकतर रद्द किंवा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत खेळाडूंना त्यांच्या घरीच रहाण्यास भाग पाडले जाते. टीम इंडिया (Team India) बर्‍याच काळापासून सतत क्रिकेट खेळत होती, यामुळे भारतीय टीमचे (Indian Team) मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की लॉकडाऊनमुळे खेळाडूंना मिळालेला ब्रेक खूप चांगला आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल अ‍ॅथर्टन आणि नासिर हुसेन यांच्याशी बोलताना शास्त्री म्हणाले, "ही (विश्रांती) वाईट गोष्ट असू शकत नाही, कारण न्यूझीलंड दौर्‍याच्या शेवटी खेळाडूंचा मानसिक थकवा, शारीरिक तंदुरुस्ती आणि दुखापतीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही." मागील वर्षी जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेंनंतर भारतीय टीमला मिळालेला ब्रेक 'स्वागतार्ह' आहे. विश्वचषक स्पर्धेनंत टीम इंडिया फक्त 10-11 दिवस कुटुंबासोबत राहिली आहे. (COVID-19 Pandemic: मैदानावर घाम गाळणारे 'हे' खेळाडू कोरोना व्हायरसच्या संकट काळात पोलीस म्हणून लढत आहे लढाई)

शास्त्री म्हणाले की, खेळाडू हा वेळ फ्रेश होण्यासाठी वापरु शकतात. शास्त्री म्हणाले, "खेळाडूंनी या वेळेचा उपयोग स्वत:च्या पुनरुत्थानासाठी करावा, विशेषत: न्यूझीलंड दौऱ्यानंतर जिथे भारत पाच टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळला." ते म्हणाले, "आम्ही गेल्या दहा महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत आहोत. काही खेळाडू तीनही फॉरमॅट खेळले आहेत, त्यामुळे ते किती थकलेले असतील हे समजू शकता. स्वत:ला कसोटीसह टी -20 क्रिकेटशी जुळवून घेणे आणि इतके प्रवास करणे सोपे नाही."

शास्त्री म्हणाले की दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिका रद्द झाल्यानंतर असे घडेल याचा खेळाडूंना अंदाज होता. ते म्हणाले, 'दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिकेच्या प्रवासात आम्हाला असे वाटले होते की असे काहीतरी घडेल. रोगाचा प्रसार त्याच वेळी होऊ लागला होता. दुसरा वनडे रद्द झाल्यानंतर आम्हाला समजले की लॉकडाउन आवश्यक आहे. जेव्हा आम्ही न्यूझीलंडहून परत आलो तेव्हा कृतज्ञतापूर्वक आम्ही योग्य वेळी परतलो. त्यावेळी फक्त दोन प्रकरणे होती, परंतु आता तिथे 300 आहेत. विमानतळावर स्क्रीनिंग आणि तपासाचा पहिला दिवस होता. अशा वेळी लोकांना जागरूक करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. यावेळी क्रिकेट मनात नसाव. विराटने निरोप दिला आहे, इतरही देत आहेत. त्यांना माहित आहे की ही बाब गंभीर आहे आणि सध्या क्रिकेट महत्वाचे नाही."