एशिया कप २०१८: भारताचा पाकिस्तानवर ९ गडी राखून दणदणीत विजय
क्रिकेट: भारतासमोर पाकचे लोटांगण (Photo Credit- File Photo)

एशिया कप २०१८साठी दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानला पुरेपूर इंगा दाखवला आहे. या सामन्यात एक-दोन नव्हे तर, तब्बल ९ गडी राखून भारताने पाकिस्तानला पराभूत केले. पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकांच्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी २३७ धावा करत विजयासाठी २३८ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाटलाग करताना भारताने ९ गडी राखून विजय मिळवला

पहिल्या डावात पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने ७८ धावा केल्या. तर, कर्णधार सरफराज अहमदने ४४ धावांचे योगदना दिले. भारताकडून गोलंदाजी करत असलेल्या बुमराह, कुलदीप आणि चहलने प्रत्येकी २ गडी बाद केले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने जबरदस्त खेळी केली. हिटमॅन शर्मा आणि गब्बर शिखर धवनने तडाखेबंद फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांची ऐशी की तैशी करुन ठेवली. शिखर धवनने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील १५वे शतक झळकावले. धवन ११४ धावा करुन बाद झाला. तर शिखरने कर्णधार शर्माला चांगली साथ दिली. त्यामुळे संघ विजयाच्या टप्प्यावर जाऊन पोहोचला.

कप्तान रोहित शर्माने १११ धावांची शानदार खेळी केली. भारतीय संघाने पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा पराभवाची धुळ चारली आहे. एशिया कपसाठी भरताचा हा चौथा विजय आहे. भारतीय फलंदाजांनी चांगली खेळी केली असली तरी, गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली. त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना वेळीच रोखण्यात भारताला यश आले.