Sushant Singh Rajput Death Case: शरद पवार कायदेशीर चौकटीतल्या गोष्टींना विरोध करत नाहीत- संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

कायदेशीर चौकटीत असलेल्या कोणत्याही गोष्टींना शरद पवार (Sharad Pawar) हे विरोध करत नाहीत. मात्र, त्यांच्या सांगण्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढला जात आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Death Case) प्रकरणात पवार यांनी सीबीआयला आमंत्रण दिले नाही. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होऊ द्या. त्यानंतरही तुम्हाला असे वाटले की, तपासाचा एखादा भाग शिल्लख राहिला आहे तर, सीबीआय किंवा इतर कोणत्याही संस्थेला हे प्रकरण तपाससाठी द्या, अशी भूमिका शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Shiv Sena) यांनी व्यक्त केली आहे. सुशांत सिंह याला न्याय मिळावा असे वाटत असेल तर काही काळ सुशांत याचे कुटुंबीय आणि इतरांनी शांत बसावे, असे अवाहनही राऊत यांनी या वेळी केले.

संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी राऊत यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर दिलेली प्रतिक्रिया आणि महाविकासआघाडी सरकार याबाबत भाष्य केले. संजय राऊत या वेळी म्हणाले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. महाविकासआघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्याबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर पुन्हा मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मी त्यावर बोलणार नाही. पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे एक प्रमुख कार्यकर्ते आहेत. महत्त्वाचे म्हणजे तो त्यांचा कुटुंबांतर्गत आणि पक्षांतर्गत प्रश्न आहे असे राऊत म्हणाले. (हेही वाचा, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली शरद पवार-पार्थ पवार यांच्याबाबत प्रतिक्रिया)

दरम्यान, सरकारबाबत बोलताना म्हणाले की, सरकारचे सर्व पूल मजबूत आहेत. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. हे सरकार चांगले काम करत आहे. हे सरकार चांगले काम करावे यासाठी शरद पवार आम्ही आणि काँग्रेस नेते सरकारला पाठिंबा देत आहोत. त्यामुले प्रसारमाध्यमांनी सरकारच्या टिकण्याबाबत कोणतीही काळजी करु नये, असेही राऊत या वेळी म्हणाले.