चार राज्यांत ‘भाजपमुक्त’, जास्त उडणारे कोसळले  - शिवसेनेची 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपावर टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Photo Credit: ShivSena/twitter)

Saamana Editorial On Assembly Elections Results 2018:  पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने 'कॉंग्रेसमुक्त' भारताचा नारा देत आपला करिष्मा दाखवला होता. मात्र आता मोदी लाट हळूहळू ओसरायला सुरूवात झाली आहे. उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्य ही भाजपाची बलस्थानं होती. मात्र नुकत्याच पार पडलेल्या भारतातील पाच विधानसभा निवडणूकांमधील भाजपाचा बालेकिल्ल्यातच झालेल्या पराभवामुळे सध्या भाजपाला 'आत्मपरिक्षणा'ची गरज असल्याचं मतं अनेकांनी व्यक्त केला आहे. आज शिवसेनेचं मुखपत्र समजलं जाणार्‍या 'सामना' (Saamana) च्या अग्रलेखातूनही भाजपा आणि मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. चार राज्यांत ‘भाजपमुक्त’, जास्त उडणारे कोसळले या मथळ्याखाली भाजपावर शिवसेनेने टीका केली आहे.

काय आहे सामन्याचा अग्रलेख

चार राज्यांत ‘भाजपमुक्त’, जास्त उडणारे कोसळल असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेने टीका केली आहे. राज्य चालवणे म्हणजे पेढी चालवणे, त्या पेढीतून टेबलाखालच्या पैशाने निवडणूक जिंकणे, हे सर्व असेच राहील या भ्रमात जे होते त्यांना मोठा धक्का जनतेने दिला. पर्यायाच्या शोधात न फसता जनतेने जे नको ते मुळापासून उखडून टाकले. लोकशाहीत पैसा, ईव्हीएम घोटाळा, दहशतवादाची पर्वा न करता जनतेने उगाच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले. असे सामन्याच्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे.

‘काँग्रेसमुक्त भारत’चे जे स्वप्न पाहिले होते त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे. किंबहुना या राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश आता दिला आहे. असा सामन्यात लिहण्यात आले आहे. Assembly Elections Results 2018 : मध्य प्रदेश, राजस्थान,छत्तीसगड विधानसभा निवडणुक निकालांमध्ये कॉंग्रेसची मुसंडी, तेलंगणामध्ये TRS तर मिझोराम MNF ने जिंकले

राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचीदेखील मोदींवर टीका

विधानसभा निवडणूक निकालामध्ये भाजपाच्या झालेल्या पिछाडीवर सामन्यातून टीका करण्यात आली त्याप्रमाणेच काल उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी देखील मीडियाशी बोलाताना भाजपाला नाकारणार्‍या जनतेचं, मतदारांचं अभिनंदन केलं आहे. तर शिवसेनेचे खास संजय राऊत यांनी हा कॉंग्रेसचा विजय नसून भाजपाविरोधातील राग मतदारंनी व्यक्त केला आहे. भाजपाने 'आत्मपरिक्षण' करावं. असा सल्ला दिला आहे. Raj Thackeray यांचा मोदी सरकारला व्यंगचित्रातून दणका

काही दिवसांपूर्वी शिवसेनेने स्वबळावर आगामी निवडणुकांना सामोरी जाणार असल्याचा नारा दिला होता. सध्या महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार आहे. येत्या चार महिन्यातच लोकसभा 2019च्या निवडणुका होतील, त्यापाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे भाजपाच्या पिछेहाटीचा हा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येणार का? भविष्यात भाजपा, शिवसेना युती करणार का ? हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.