जागतिक महिला दिनाच्या शुभेत्छा (Photo Credits-File Image)

दरवर्षी 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगात 'जागतिक महिला दिन' म्हणून उत्साहात साजरा केला जातो. केवळ शुभेच्छा देणे किंवा कार्यक्रम आयोजित करणे एवढ्यापुरताच हा दिवस मर्यादित नाही, तर समाजाच्या जडणघडणीत स्त्रियांचे असलेले योगदान मान्य करण्याचा आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा हा एक जागतिक संकल्प आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत महिलांनी मारलेली भरारी आज जगासमोर आहे.

महिला दिनाचा ऐतिहासिक संदर्भ

जागतिक महिला दिनाची मुळे न्यूयॉर्कमधील महिला कामगारांच्या संघर्षात दडलेली आहेत. १९०८ मध्ये सुमारे १५ हजार महिलांनी कामाचे तास कमी करावेत, चांगले वेतन मिळावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा, या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाचे स्मरण म्हणून १९१० मध्ये क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा प्रस्ताव मांडला. पुढे १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (UN) ८ मार्चला अधिकृत मान्यता दिली.

संघर्षाचा इतिहास

जागतिक महिला दिनाची मुळे ही एका मोठ्या लढ्यात आहेत. २० व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा स्त्रियांना कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत होता, तेव्हा न्यूयॉर्कमधील हजारो महिला कामगारांनी ररस्त्यावर उतरून न्यायाची मागणी केली होती. 'कामाचे निश्चित तास' आणि 'मतदानाचा अधिकार' यासाठी त्यांनी दिलेला हा लढा ऐतिहासिक ठरला. याच संघर्षातून पुढे ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांसाठी समर्पित करण्यात आला.

कर्तृत्वाची नवी क्षितिजे

आजची स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन तिने आभाळाला गवसणी घातली आहे. राजकारण असो वा समाजकारण, क्रीडा क्षेत्र असो वा अंतराळ संशोधन, प्रत्येक ठिकाणी स्त्रिया आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरत आहेत. भारतात सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली शिक्षणाची ज्योत आज घरोघरी प्रकाश देत आहे. आजच्या स्त्रिया केवळ नोकरी करत नाहीत, तर त्या अनेक मोठ्या उद्योगांचे नेतृत्व करत असून हजारो हातांना काम देत आहेत.

सक्षमीकरण आणि वास्तव

महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ स्त्रियांना आरक्षण देणे नव्हे, तर त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे आणि त्यांच्या विचारांचा आदर करणे होय. आजही आपल्या समाजात स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारल्या जातात, तरीही अनेक ठिकाणी स्त्रियांना भेदभावाचा सामना करावा लागतो. स्त्रीभ्रूणहत्या, सुरक्षेचा अभाव आणि कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या समस्यांना मुळापासून उपटून टाकणे, ही आजच्या काळाची गरज आहे. खऱ्या अर्थाने सक्षमीकरण तेव्हाच होईल, जेव्हा एखादी स्त्री भीतीमुक्त होऊन रात्रीच्या वेळीही मुक्तपणे संचार करू शकेल.