डंबुला येथे भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यात खेळल्या गेलेल्या त्रिकोणीय मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कमालीचा ड्रामा पाहायला मिळाला. मुख्य ५० षटकांचा सामना बरोबरीत (टाय) सुटल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय झाला. या सुपर ओव्हर दरम्यान पंचांचे काही वादग्रस्त निर्णय, भारतीय कर्णधार तिलक वर्माचा संताप आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकन गोलंदाजासोबत झालेला वाद यामुळे मैदानात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
खराब प्रकाश आणि सुपर ओव्हरचा निर्णय
सामन्याची मुख्य ५० षटके संपली तेव्हा दोन्ही संघांनी समान २६५ धावा केल्या होत्या. खराब प्रकाशामुळे मैदानातील दृश्यमानता अत्यंत कमी झाली होती. त्यामुळे मैदानी पंच पुढील खेळ थांबवण्याच्या विचारात होते. मात्र, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सुपर ओव्हर खेळवण्यास संमती दर्शवली.
खेळ सुरू होण्यापूर्वीच मैदानावर गोंधळ सुरू झाला. भारतीय खेळाडू मैदानावर गोलंदाजीसाठी सज्ज उभे होते, तर श्रीलंकेचे फलंदाज मैदानात येण्यास विलंब करत होते. अखेर काही वेळाने सहान अराचिगे आणि अविष्का फर्नांडो फलंदाजीसाठी आले आणि भारताकडून अर्शद खानने गोलंदाजीची धुरा सांभाळली.
वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकन खेळाडूशी वाद
श्रीलंका 'अ' संघाने सुपर ओव्हरमध्ये बिनबाद १६ धावा करत भारतासमोर १७ धावांचे कठीण आव्हान ठेवले. अत्यंत कमी प्रकाशात भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. परंतु, श्रीलंकेचा गोलंदाज कुगाथास मथुलन याने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताला केवळ ९ धावांवर रोखले आणि श्रीलंकेने विजय मिळवला.
सामना संपल्यानंतरही मैदानातील ड्रामा संपला नाही. सामना संपल्याच्या घोषणेनंतर वैभव सूर्यवंशी जेव्हा सूर्यांश शेडगेसोबत चर्चा करत होता, तेव्हा विरोधी संघाच्या खेळाडूने काहीतरी टिप्पणी केली. यावरून वैभव प्रचंड संतप्त झाला. तो मागे फिरला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. प्रकरण एकमेकांना ढकलण्यापर्यंत पोहोचले होते, परंतु इतर खेळाडूंनी आणि पंचांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
🚨 HEATED ARGUMENT BETWEEN VAIBHAV AND SRI LANKA 🚨
Sri Lankan Players : This is not an IPL, this Int'l cricket 🧐
Vaibhav Sooryavanshi : This is not the end of the tournament, just a normal match 🤪
Sri Lankan started this and Vaibhav ended it 😳pic.twitter.com/QDNbFftd0t
— Ajay Jadeja (@AjayJadeja171) June 15, 2026
कर्णधार तिलक वर्मा पंचांवर संतापला
अर्शद खानने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाने स्कूप मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. भारतीय खेळाडूंना वाटले की हा डॉट बॉल आहे, मात्र पंचांनी तो वाईड बॉल घोषित केला. या निर्णयावर कर्णधार तिलक वर्मा कमालीचा नाराज झाला आणि त्याने पंचांशी थेट चर्चा करत आपली बाजू मांडली.
त्यानंतर लगेचच पंचांनी एका फुलटॉस चेंडूला टीव्ही पंचांच्या मदतीने कमरेच्या वरचा 'नो बॉल' घोषित केला. हा निर्णय झाला तेव्हा भारतीय खेळाडू मैदान सोडून जात होते, पण त्यांना पुन्हा परत यावे लागले. लागोपाठच्या या वादग्रस्त निर्णयांमुळे तिलक वर्मा अत्यंत आक्रमक झाला आणि त्याने पंचांकडे उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.