भाजप (BJP) नेत्यांना विविध प्रकरणात उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात मिळत असलेला जामीन आणि दिलासा यावरुन शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय (Sanjay Raut) राऊत यांनी जाहीर वक्तव्य केले. त्यानंतर त्यांनी आता एक सूचक ट्विटही केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी 'आणखी एक दिलासा घोटाळा' (Consolation Scam) असे म्हटले आहे. त्यामुळे राऊत यांचा हा निशाणा न्यायालयाच्या आणि भाजपच्या दिशेने तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पाठीमागील काही दिवसांमध्ये प्रवीण दरेकर, नितेश राणे आणि आता किरीट सोमय्या यांना न्यायालयात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना न्यायालयात मिळत असलेल्या दिलाशांवरुन चर्चा सुरु झाली आहे.
न्यायालयात दिलासा मिळालेले प्रातिनिधीक भाजप नेते आणि प्रकरणे
- प्रविण दरेकर- मुंबै बँक घोटाळा (मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा)
- नारायण राणे- दिशा सालियन प्रकरण (दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाल्यने दिलासा)
- किरीट सोमय्या- INS विक्रांत घोटाळा आरोप प्रकरण (मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन) (हेही वाचा, Sanjay Raut On Mohan Bhagwat: आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा; संजय राऊत यांचा मोहन भागवत यांना खोचक टोला)
आणखी एक दिलासा घोटाळा!!!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 13, 2022
दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री आणि विविध नेत्यांकडूनही न्यायालयाकडून भाजप नेत्यांना विविध प्रकरणात मिळणाऱ्या दिलाशांवरुन अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. संजय राऊत यांनी मात्र 'भाजप नेत्यांना मिळत असलेले दिलासे आश्चर्यकारक' असल्याचेही म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणात दिलासा मिळताच ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उद्याच (15 एप्रिल) बाहेर काढणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा 'सामना' आता अधिकच तीव्र होत चालला आहे.