उस्मानाबाद येथील मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर छत्रपती संभाजीराजे यांचा आक्रमक पवित्रा; पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करण्याची ट्विटरवरुन मागणी (पहा व्हिडिओ)
उस्मानाबाद येथील मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर 'आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा,' अशी मागणी करणारे ट्विट खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.
प्रवेशाच्या चिंतेतून उस्मानाबादच्या एका मराठा विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली. अद्याप काही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटवरुन आपली संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. "आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा," अशी मागणी करणारे ट्विट त्यांनी केले आहे. (उस्मानाबाद: अपेक्षित कॉलेजला अॅडमिशन मिळेल की नाही या चिंतेतून विद्यार्थ्याची आत्महत्या)
उस्मानाबाद येथील अक्षय शहाजी देवकर (16) या मुलाला दहावीत 94.20% गुण मिळूनही अपेक्षित कॉलेजमध्ये अॅडमिशन न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांचे ट्विट्स:
उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवले आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला ९४% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019
समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकार मधले नेते असोत किंवा विरोधी पक्षातले. 'योग' करत आपण दोन मिनिट शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत?? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय??
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019
भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु वास्तवात आपलं आचरण त्याप्रकारचं आहे कां? की उगाच मुह में राम, बगल में सूरी असा प्रकार चालू आहे? नाहीतरी आज एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर खरी सुरुवात होती.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019
आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी शेतकरी आत्महत्येकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील ते युवक आणि ज्यांच्या मुळे आपलं आज जीवंत असणं सुरक्षित आहे ते शेतकरी, ह्या सर्वांना असुरक्षित कां वाटतंय ? कां म्हणून ते स्वतःला संपवत आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019
एकमागून एक ट्विट करत त्यांनी सध्याची समाज्यातील परिस्थिती समोर मांडली आहे.
मला वाटतंय की आपल्या 'व्यवस्थेतच' मोठा दोष आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही? असे अनेक प्रश्न राज्यासमोर आवासून उभे आहेत
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019
यामध्ये नेत्यांसोबत प्रशासनसुद्धा तेवढंच जबाबदार आहे.केवळ नेत्यांवर प्रत्येक गोष्ट शेकते म्हणून तुमच्यावर कुणाचं लक्षंच नाही असं समजू नका. 'शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये' असं शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते,ते आजही तंतोतंत खरे आहे
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019
आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019
इतकंच नाही तर त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
केवळ पुढाऱ्यांनीच नाही तर अधिकाऱ्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत शिक्षण मोफत करा. शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे. pic.twitter.com/mg8MzJmCVw
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019
मला कोणत्याही सरकारच्या विरोधात बोलायचं नाही. मात्र या मुलाने आत्महत्या का केली, यासाठी चिंतन करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शिक्षण मोफत मिळावं, हा शाहु महाराजांचा विचार समाज्यात उतरवण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2019 06:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

