मुंबई महापालिका Israeli Technology द्वारे मुंबईकरांना पुरवणार समुद्राचे शुद्ध पाणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत इस्त्राईल दुतावासाचे मराठीतून ट्विट

मुंबईकरांना आता समुद्राचे क्षारयुक्त पाणी शुद्ध स्वरुपात मिळणार आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि मुंबईकरांवर वारवंवार ओढवणारे पाणीसंकट दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने एक योजना आखली आहे. इस्त्रायली तंत्रज्ञानाच्या आधारे मुंबईतील समुद्राचे पाणी गोड होणार आहे.

मुंबई महापालिका Israeli Technology द्वारे मुंबईकरांना पुरवणार समुद्राचे शुद्ध पाणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत इस्त्राईल दुतावासाचे मराठीतून ट्विट
BMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईकरांना आता समुद्राचे क्षारयुक्त पाणी शुद्ध स्वरुपात मिळणार आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि मुंबईकरांवर वारवंवार ओढवणारे पाणीसंकट दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने एक योजना आखली आहे. इस्त्रायली तंत्रज्ञानाच्या आधारे मुंबईतील समुद्राचे पाणी गोड होणार आहे. या प्रकल्पाला वेग मिळाला असून मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) आणि आयडीई वॉटर टेक्नॉलॉजीज लिमिटेड (IDE Technologies Ltd.) यांच्यात एक करार नुकताच पार पडला. हा करार झाल्यानंतर इस्त्रायली दुतावासाने मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मराठीतून ट्विट करत आभार मानले.

साधारण 200 दशलक्ष लिटर पाण्याचे नि:क्षारीकरण करणाऱ्या या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याबाबत हा सामंजस्य करार सोमावारी करण्यात आला. मालाड, मनोरी येथे हा प्रकल्प होणार असल्याचे समजते. गेली अनेक वर्ष या प्रकल्पाबाबत प्रयत्न सुरु होते. अखेर या प्रयत्नाला मूर्त स्वरुप मिळत आहे. सामंजस्य कराराचा हा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहात पार पडला. या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, इस्त्रायलचे महावाणिज्यदुत याकोव फिनकेलस्टाईन, आय.डी.ई वॉटर टेक्नॉलीजीचे पदाधिकारी, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, एमएमआरडीए आयुक्त एस. श्रीनिवास यांच्यासह इतरही काही अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रष, मुंबई महापालिका आणि इस्त्रायली कंपनीसोबत झालेल्या या कराराचे इस्त्रायली दुतावासानेही कौतुक केले आहे. या कराराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत इस्त्रायली दुतावासाने मराठीत खास ट्विट केले आहे. इस्त्रायली दुतावासाने मराठीत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाण्याचे,पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला निक्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे''. (हेही वाचा, Mumbai Sero Survey: मुंबईमधील 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या Covid-19 च्या अँटीबॉडीज; BMC ने केले सीरो सर्वेक्षण)

इस्त्रायली दुतावास ट्विट

दरम्यान, या सामंजस्य करारानुसार प्रकल्पाचा डीपीआर 2022 पर्यंत होणार तर प्रत्यक्षात 2025 मध्ये प्रकल्प सुरु होणार आहे. या प्रकल्पातून मुंबईकरांना 200 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळणार आहे. अभ्यासकांना आढळून आले की, मनोरी येथील पाण्याची गुणवत्ता चांगल्या पद्धतीची आहे. तसेच, खुल्या समुद्राची उपलब्धात असलेल्या या ठिकाणी कांदळवनही आढळत नाही. याशिवाय हा परीस संवेदनशील क्षेत्रापासून बऱ्याच दूर अंतरावर आहे. परिणामी या प्रकल्पासाठी हे स्थळ योग्य असल्याने इथेच हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2021 11:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).