MSEDCL Bill Recovery: विजबील थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडीत होण्याची शक्यता, महावितरण राबवणार मोहीम
Electricity | Representational Image (Photo Credits: Pixabay)

लॉकडाऊन काळात किंवा त्याही आधीपासून तुमचे विजबिल थकले असेल तर जवळच्या महावितरण (MSEDCL) कार्यालयाशी तत्काळ संपर्क करा. विजबील भरा अन्यथा तुमचा विजपूरवठा खंडीत होऊ शकतो. महावितरणने आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या आदेशानुसार यापुढे मोहीम राबवून थकबाकी वसूल (MSEDCL Bill Recovery) केली जाणार आहे. जे ग्राहक थकबाकीदार (Electricity Bill Arrears) आहेत त्यांचा विद्युतपुरवठा खंडीत केला जाणार आहेत. महावितरणने ही मोहीम अधिक प्रभावी राबवली तर अनेक ग्राहकांना त्याचा फटका बसू शकतो.

प्राप्त माहितीनुसार, राज्यभरात एकूण 63,740 कोटी रुपये इतकी विजबीलाची थकबकी आहे. ही थकबाकी डिसेंबर 2020 अखेरची आहे. ग्राहकांनी आपली थकीत विजबीले लवकरात लवकर भरावीत. वीज बिल वेळेत भरले नाही तर त्यांचा विद्युतपुरवठा खंडीत केला जाईल, असे महावितरणने म्हटले आहे. विजबील थकबाकी असलेले ग्राहक सर्व प्रकारचे आहेत. यात कृषिपंप ग्राहक, वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक स्वरपाच्या ग्राहकांचाही समावेश आहे. कृषिपंप ग्राहकांकडे तब्बल 45,498 कोटी रुपये, वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे 8458 कोटी रुपेय तर उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणने म्हटले आहे. (हेही वाचा, महावितरण कंपनीचे ग्राहकांना थकबाकी बिल भरण्याचे आवाहन अन्यथा वीज पुरवठा होणार खंडित)

विजबील आणि विजबिल वसूली हा राज्यात एक वादाचा आणि चर्चेचा मुद्दा ठरला आहे. राज्यात मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. या काळात नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. दरम्यानच्या काळात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विजबील माफी देणार असल्याचे जाहीर केले. पुढे त्यांनी आपल्या घोषणेत बदल करत काही सवलत देण्याचा विचार बोलून दाखवला. आता मात्र सवलत, माफी हे मुद्दे सोईस्करपणे बाजूला सारत महावितरणने विजबील वसूलीवर भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, महावितरणने ग्राहकांना विजबीलात सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा या आधीच उपलब्ध करुन दिली आहे. तसेच, डीसेंबर 2020 अखेरपर्यंत कोणत्याही ग्राहकाचा विद्युतपुरवठा खंडीत करु नये अशा सूचना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्या होत्या. या शिवाय थकबाकीवर विलंब आकार न लावण्याबाबतचा निर्णयही महावितरणने घेतला आहे. वाढता खर्च आणि थकबाकीचा डोंगर यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने वसूलीवर भर दिला आहे.