Monsoon Updates: वरुणराजा परतला, बळीराजा हरकला; जाणून घ्या पावसाची राज्यभरातील स्थिती
पाऊस (संग्रहित छायाचित्र)

Monsoon Updates in Maharashtra: हो..ना.. करत करत यंदा उशीरा का होईना पावसाने हजेरी लावली. मात्र, आगोदरच उशीरा आलेल्या या पावसाने नेहमीप्रमाणे मुक्काम न ठोकता पुन्हा लगेच दडी मारली. ऐन पावसाळ्यातही आकाशातील ढग गायब झाल्याने बळीराजा, ग्रामीण जनता आणि सरकारही हवालदील झाले. राज्यावर पुन्हा एकदा दुष्काळ (Drought) आणि पाणीटंचाईचे (Water Scarcity) सावट निर्माण झाले. दरम्यान, शनिवार (20 जुलै 2019) पासून पावसाने राजधानीचे शहर मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. त्यामुळे राज्यात सध्या वरुणराजा परतला बळीराजा हरकला अशी स्थिती पाहायला मिळत आहे. जाणून घ्या पावसाची राज्यभरातील स्थिती.

मुंबई शहरात पाऊस पुन्हा दमदार

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये शनिवारी दुपारी दमदार पाऊस पडला. मुंबईच्या पश्चिम उपनगरांसह दहिसर, बोरिवली, तसेच भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई, डोंबिवली येथे नागरिकांना दमदार पाऊस अनुभवायला मिळाला. हवामान विभागाने माहिती देताना सांगितले की, नवी मुंबई येथे (दुपारी) २० ते ४० मिमी,ठाणे आणि परिसरात १० ते २० मिमी, सांताक्रूझ केंद्रावर (रात्री साडेआठ वाजता) ५.४ मिमी, कुलाबा केंद्रावर १०.४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

विदर्भ मराठवाड्यात दमदार हजेरी

मराठवाड्यात व्याकूळ झालेला बळीराजा कोरड्या आकाशाकडे डोळे लाऊन होता. गेली अनेक दिवस मेघराजाने त्याची निराशा केली होती. मात्र, शनिवारी दिवसभरात आभाळ ढगांनी अच्छादून गेले आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. लासूर, वैजापूर, पाचोडा तसेच, बीड वैगेरे ठिकाणी पावासाने चांगली हजेरी लावली. जालन्यातही पावासाने चांगली हजेरी लावली. तर विदर्भात नागपूर आणि इतर ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पाहायला मिळाला. (हेही वाचा, Maharashtra Monsoon 2019 Update: औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईत समाधानकारक तर सोलापूरात कृत्रिम पावसाची चाचणी, जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान)

कोकण

कोकणातही पावसाने पुन्हा एकदा आपला जोर वाढविल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणात वेंगुर्ला, मालवण, देवगड, पणजी, रामेश्वरवाडी, भिवंडी, दापोली, दोडामार्ग, हर्णे, भिरा, गुहागर, मंडणगड आदी भागाद पावसाने जोर वाढवला आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर म्हणावा तसा नसला तरी, काही भागात पावसाची तुरळक हजेरी पाहायला मिळत आहे. बारामती, माळशिरस, सिन्नर, फलटण , कोल्हापूर, चंदगड, चांदवड, संगमेश्वर, शिरपूर,पुणे ३०, आजर आदी ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पाहायला मिळला.

राज्य सरकार राबवणार कृत्रिम पावसाचा प्रयोग

दरम्यान, पावसाने पुन्हा एकदा आगमन केले असले तरी, पावसाची यंदाची कामगिरी तितकीशी समाधानकारक नाही. त्यामुळे नैसर्गिक पावसाच्या भरवशावर न राहता एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग करुन पाहू असा राज्य सरकारचा विचार आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला जाणार आहे. राज्यात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग सोलापूर जिल्ह्यात होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस कसा राहिल याबाबत उत्सुकता आहे.