कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई, पुण्यात लष्कर बोलवणार? जाणून घ्या यामागील व्हायरल सत्य
Indian Army (Photo Credits- PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याचा गैरफायदा घेत काही समाजकंटक सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर आज दिवसभर एक मॅसेज व्हायरल होत आहे. ज्यात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई आणि पुण्यात लष्कर ( Military) बोलवणार आहेत. यामुळे शनिवारपासून पुढील 10 दिवस मुंबई, पुण्यात सर्वकाही बंद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा मॅसेज खोटा असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात चुकीच्या माहितीचा प्रसार केला जात आहे. यातच व्हाट्सऍवर एक मॅसेज व्हायरल होत आहे. ज्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. ज्यात लिहले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता न आल्याने मुंबई आणि पुण्यात लष्कर बोलवण्यात आले आहे. यामुळे शनिवारपासून पुढील 10 दोन्ही शहरात सर्वकाही बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना केवळ दुध आणि मेडिकल सुविधा चालू ठेवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी आधीच किराणा माल आणि भाजीपाल्याचा साठा करुन ठेवा. महाराष्ट्र सरकारमध्ये बैठक सरु असून लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते, असे या मॅसेजमध्ये सांगण्यात आले आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना व्हायरसच्या 1002 नव्या रुग्णांची नोंद; शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 32,791 वर

मुंबई पोलिसांचे ट्वीट-

देशात येत्या 31मे पर्यंत लॉकडाउन असणारआहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून चुकीच्या माहितीचा प्रसार करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र, तरीही काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवत असल्याचे समजत आहे.