COVID19 Vaccine Research: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कोविड19 च्या लसवर संशोधन; महाराष्ट्र सरकारकडून 30 Rhesus माकडांना पकडण्यास परवानगी
Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच पुणे (Pune) येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (National Institute of Virology) कोविड19 च्या लसवर संशोधन केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 30 ऱ्हीसस माकडांना (Rhesus Monkeys) पकडण्यास परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय संशोधन करण्यासाठी ऱ्हीसस मकाकस किंवा ऱ्हीसस माकडांचा वापर केला जातो. हे माकड दक्षिण व पूर्व आशियामध्ये आढळतात. वैद्यकीय संशोधन करण्यासाठी एनआयव्हीला चार ते पाच वयोगटातील माकडांची आवश्यकता आहे, अशी माहीती एका वन अधिकाऱ्याने दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या मनात घबराट पसरली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणू संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. यात भारताचाही समावेश आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचारी मोलाचा वाटा उचलत आहेत. यातच पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कोविड19 च्या लसवर संशोधन केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, 30 ऱ्हीसस माकडांना पकडण्यात येणार आहे. माकडांना पकडण्याची जबाबदारी अनुभवी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात येईल. दरम्यान, त्यांना सुरक्षितता महत्वाची असणार आहे. तसेच त्यांना कोणतीही जखम होणार नाही, याचीही काळजी घेण्यात यावी, या अटींवर महाराष्ट्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. हे देखील वाचा- खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांचे दर निश्चिती करण्यासाठी राज्य शासनाकडून 4 सदस्यीय समिती गठीत

पीटीआयचे ट्वीट-

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात (शनिवार) आज 2 हजार 739 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 82 हजार 898 वर पोहचली आहे. यापैकी 37 हजार 390 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 2 हजार 969 जणांचा मृत्यू झाला आहे.