Maharashtra Assembly Elections 2019: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पक्षाच्या झेंड्यावरुन वाद
शरद पवार आणि अजित पवार (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) लवकरच विधानसभा निवडणूका (Assembly Elections) होणार आहेत. परंतु अद्याप निवडणूकीच्या तारखा स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. तर राजकीय पक्षांकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा अन्य गोष्टींबाबत घौडदौड सुरु झाली आहे. तर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी बीड येथे 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या रॅली किंवा कार्यक्रमादरम्यान दोन वेगवेगळे झेंडे लावण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याच कारणावरुन आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वी वाद निर्माण झाला आहे. तर अजित पवार यांनी झेंड्याबाबत घेतलेला निर्णय हा शरद पवार यांना पटलेला नसून पक्षाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या महिन्यात 23 ऑगस्टला परभणी येथे एका रॅलीदरम्यान अजित पवार यांनी असे म्हटले होते की, पक्षाच्या कार्यक्रमावेळी दोन झेंडे फडकवण्यात येणार आहे. त्यामधील एक झेंडा पक्षाचा असून तिरंग्याच्या मध्ये घड्याळाचे चिन्ह असणार आहे. तर दुसरा झेंडा भगवा रंगाचा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असणार आहे. असे मानले जात आहे की, अजित पवार यांचा झेंड्याबाबतचा निर्णय हा हिंदूत्ववादाकडे इशारा करत आहे.

मात्र अजित पवार यांनी झेंड्याबाबत घेतलेला निर्णय हा पक्षाचा नसून व्यक्तिगत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तर यापूर्वी सुद्धा अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काही कारणांवरुन वाद झाले असल्याचे समोर आले होते.(Maharashtra Assembly Elections 2019: धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा सह 5 जणांना NCP कडून उमेदावारी जाहीर; शरद पवार यांच्याकडून बीड मध्ये घोषणा)

2013 मध्ये अजित पवार यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात पाऊस पडत नसल्याने पाणी कुठून येणार, लघुशंका करुन तर धरण भरु शकत नाही ना? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केला होता. तर अजित पवार यांच्या या विधानामुळे शरद पवार यांनी ट्वीट करत माफी मागितली होती. 2013 मध्ये अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर शरद पवार केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री होते. त्याचसोबत 2014 मध्ये काँग्रेस सोबत युती करण्याबाबत दोन्ही पवार यांच्यामध्ये मतभेद झाले होते.