
आजकाल लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन (Smartphone) ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. शाळा असो, कॉलेज असो किंवा घर असो, इथे जवळजवळ प्रत्येक मुलाकडे मोबाईल आहे. मात्र हे स्मार्टफोन मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करत आहेत. अलिकडेच सेपियन लॅब्सने ‘द युथ माइंड: राईजिंग अॅग्रेशन अँड अँगर’ नावाचा एक अभ्यास केला आहे. या अभ्यासात भारत आणि अमेरिकेतील 13-17 वयोगटातील मुलांबद्दल चर्चा केली आहे. लहान वयातच जेव्हा मुले स्मार्टफोन वापरायला लागतात तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो, हे या अभ्यासातून समोर आले आहे. विशेषतः, स्मार्टफोनच्या अति वापरामुळे मुलांमध्ये आक्रमकता, राग आणि चिडचिडेपणा वाढत आहे. या बदलांमुळे त्यांच्या मानसिक आरोग्याची चिंता वाढत आहे.
स्मार्टफोनचा मानसिक आरोग्यावर परिणाम-
स्मार्टफोनचा वापर आपल्या मेंदूवर विविध प्रकारे परिणाम करू शकतो. अनेक अभ्यासांनुसार, स्मार्टफोनचा अत्यधिक वापर मानसिक आरोग्य, संज्ञानात्मक क्षमता, आणि सामाजिक कौशल्यांवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो. अभ्यासानुसार, 13 वर्षांच्या मुलांनी सरासरी 10 व्या वर्षी स्मार्टफोन मिळवले, तर 17 वर्षांच्या मुलांनी 11 किंवा 12 व्या वर्षी. अमेरिका आणि भारतातील किशोरवयीन मुलांमध्ये दुःख, भीती आणि अपराधीपणाच्या भावना सामान्य आहेत, आणि या भावना त्यांच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणतात. अभ्यासानुसार, 13 वर्षांच्या मुलांमध्ये 17 वर्षांच्या मुलांपेक्षा 20% अधिक भ्रम आणि 40% अधिक आक्रमकता, शत्रुत्व आणि चिडचिड आढळली आहे.
या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लहानपणापासूनच स्मार्टफोन वापरण्यास सुरुवात केलेल्या मुलांमध्ये मानसिक समस्या अधिक गंभीर होत आहेत. यामुळे मुलांमध्ये राग, चिडचिडेपणा आणि आक्रमकतासह नैराश्य (दुःखी वाटणे) आणि चिंता यासारखी काही नवीन लक्षणे देखील उदयास आली आहेत. तसेच, मुलांमध्ये पुन्हा पुन्हा काही नकारात्मक किंवा त्रासदायक विचार येऊ लागतात. काही मुलांना वास्तवापासून अलिप्त वाटू लागले आहे, यावरून असे दिसून येते की, मोबाईल फोनचा जास्त वापर मुलांच्या मानसिक आरोग्यात गंभीर समस्या निर्माण करत आहे.
त्याच अभ्यासात असेही नमूद केले आहे की जेव्हा मुले अगदी लहान वयात स्मार्टफोन वापरण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांना इंटरनेटवर अशा गोष्टी दिसू शकतात ज्या त्यांच्यासाठी योग्य नाहीत. याशिवाय, स्मार्टफोनच्या जास्त वापरामुळे त्यांची झोपही बिघडते आणि ते लोकांशी कमी संवाद साधतात. याचा त्यांच्या सामाजिक कौशल्यांवर, म्हणजेच समाजात मिसळण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, जे मुलांसाठी खूप महत्वाचे आहे, विशेषतः जेव्हा त्यांना कोणत्याही समस्येचा किंवा संघर्षाचा सामना करावा लागतो.
मुलांपेक्षा मुलींना जास्त त्रास होत आहे-
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मोबाईल फोनच्या अतिवापराचा विशेषतः मुलींवर जास्त परिणाम होत आहे. मुलींमध्ये आक्रमकता आणि राग जास्त दिसून येतो. संशोधनात समाविष्ट असलेल्या 65% मुलींनी त्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: Cancer Vaccine For Women: देशातील 9 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींना मिळणार कर्करोगाची लस; येत्या पाच ते सहा महिन्यांत होणार उपलब्ध)
अमेरिकेपेक्षा भारतात मानसिक आरोग्यातील घसरण कमी-
अमेरिका आणि भारतातील मानसिक आरोग्याची परिस्थिती वेगळी आहे. अमेरिकेत, पुरुष आणि महिला दोघांमध्येही मानसिक आरोग्यात घट दिसून येत आहे, म्हणजेच दोघांमध्येही मानसिक समस्या वाढत आहेत. पण भारतात परिस्थिती थोडी वेगळी आहे. येथे, मानसिक आरोग्यात घट फक्त महिलांमध्ये दिसून आली आहे, तर पुरुषांमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. याचा अर्थ असा की, भारतातील मुलींना मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक जाणवत आहेत, तर काही प्रकरणांमध्ये मुलांमध्ये सुधारणा होत आहे.
मुलांना लवकर डिजिटल सुविधा मिळाल्याने झालेला परिणाम-
मुलांना लवकर डिजिटल सुविधा मिळाल्यास दोन्ही प्रकारे परिणाम होऊ शकतो. एकीकडे, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे शिक्षण सर्वांना सहज उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे लाखो मुलांना शिकण्याच्या नवीन संधी मिळाल्या आहेत. पण दुसरीकडे, ते मुलांना काही धोकादायक आणि वाईट गोष्टींकडे नेऊ शकते, जसे की नकारात्मक आणि हानिकारक वर्तन. म्हणून, डिजिटल अॅक्सेसचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात, जे मुलांना ते कसे वापरायचे हे शिकवले जाते यावर अवलंबून असते. या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, पालकांनी आपल्या मुलांच्या स्मार्टफोन वापरावर लक्ष ठेवणे आणि त्यांना मर्यादित वापरासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण होऊ शकेल.