औषधांपेक्षाही गुणकारी आहेत पावसाळ्यातील फोडशी, टाकळासह या रानभाज्या, जाणून घ्या सविस्तर
जर तुम्ही या 5 रानभाज्यांची चव चाखली नसाल तर आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने हितावह म्हणून या रानभाज्या अवश्य चाखून पाहाल याची आम्हाला खात्री आहे.
पावसाळा (Monsoon) आला की शक्यतो आपल्याला पालेभाज्या खाऊ नये असा सल्ला दिला जातो. त्यामुळे पालेभाज्या खाणा-यांचा मोर्चा वळतो तो रानभाज्यांकडे. कारण ह्या भाज्या फक्त आणि फक्त पावसाळ्यातच येतात. त्यामुळे नानाविध प्रकारच्या गुणकारी अशा रानभाज्यांचा जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात ही संधी दवडू नका. कित्येकदा आपल्याला त्या रानभाज्यांची नावे आणि फायदे माहित नसतात. किंवा आपल्याला माहित असलेल्या पालेभाज्यांपेक्षा रानभाज्यांची चव थोडी वेगळी असल्यामुळे अनेक जण नाक मुरडतात.
म्हणूनच आज आम्ही अशा 5 रानभाज्यांची नावे सांगणार आहोत, ज्याचे गुणकारी फायदे ऐकून तुम्हीही आर्श्चचकित व्हाल. म्हणूनच जर तुम्ही या 5 रानभाज्यांची चव चाखली नसाल तर आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने हितावह म्हणून या रानभाज्या अवश्य चाखून पाहाल याची आम्हाला खात्री आहे. पाहा कोणत्या आहेत या रानभाज्या.
1. कंटोळी (Momordica Dioica)
कंटोळी ही रानभाजी डोंगराळ भागात आढळते. याला कंटोळा असेही म्हणतात. ही रानभाजी दिसायला कारल्यासारखी पण लहान असतात. ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे.

- कंटोळी खाण्याचे फायदे:
1. डोकेदुखीवर ही अतिशय गुणकारी रानभाजी आहे.
2. मधुमेहाच्या रुग्णांनी ही भाजी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
3. यात फायबरचे प्रमाण अधिक असून कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
4. डोळे, हृद्यांविषयीचे आजार आणि कॅन्सर या रोगावर मात करण्यासाठी प्रतिकात्मक शक्ती निर्माण करते.
5. सर्दी, खोकल्यावर कंटोळी अतिशय गुणकारी आहे.
6. पचनक्रिया सुधारण्यास मदत करते
2. टाकळा:
ही वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात उगवते. सिसालपिनेसी या कुळातील असलेल्या या भाजीचं नाव कॅसिया टोरा असं आहे. ही भाजी पडीक किंवा ओसाड जमीन, शेतात, बागांमध्ये, जंगलात, रस्त्याच्या कडेने कुठेही वाढते.

- टाकळा खाण्याचे फायदे:
1. सर्व प्रकारच्या त्वचारोगांमध्ये ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. त्वचा जड झाल्यास ही वनस्पती खाल्ल्याने विशेष उपयोग होतो. याशिवाय इसब, अॅलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात.
2.पानांचं भाजीच्या रूपात सेवन केल्याने पोटातील कृमी नष्ट होतात.
3. दात येणा-या लहान मुलांना ताप येतो. अशा वेळी टाकळ्याच्या पानांचा काढा त्यांना दिल्याने तापावर नियंत्रण येते.
4. पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला आदी विकारांवर पानाचा रस मधातून द्यावा. आराम पडतो.
5. टाकळ्याची भाजी ही मुळात उष्ण असल्यामुळे शरीरातील वात आणि कफदोष कमी होण्यास मदत होते.
6.पावसाळ्यात शरीराला सुटणारी खाजही कमी होते.
3. काटेमाठ:
ही भाजी पावसाळ्यात ओसाड जमिनीवर किंवा रस्त्याच्या कडेली या भाज्या वाढतात. या वनस्पतीला सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये फुले येतात.

- काटेमाठ खाण्याचे फायदे:
1. बाळंतिणीच्या जेवणात ही भाजी खाल्ल्याने अंगावरील दूध वाढण्यास मदत होते.
2. गर्भपात होण्याचे टळते आणि गर्भाचे नीट पोषण होते.
3. पित्त, मूळव्याध, रक्तविकार यावर गुणकारी
4. पचण्यास हलकी असल्याने पचनक्रिया सुधारते
4. आघाडा:
ही वनस्पती ओसाड जमिनीवर, जंगलात आणि शेतात आढळते. या वनस्पतीची मुळे, पाने,फळे औषधात वापरतात.

- आघाडा खाण्याचे फायदे:
1. लघवी साफ होण्यास मदत होते
2. या भाजीमुळे हाडे मजबूत होतात.
3. वात, हृद्यरोग, मूळव्याध, मुतखडा या आजारांवर गुणकारी
4. अंगातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते
5. पचनशक्ती सुधारते
5. गुळवेल:
ही भाजी झाडांवर अथवा कुंपणावर असतात. याला अमृतवेल, अमृतवल्ली या नावाने देखील ओळखले जाते.

- गुळवेल खाण्याचे फायदे:
1. मधुमेहासाठी फायदेशीर
2. कावीळमध्ये भाजीचे सेवन करावे
3. सर्दी, खोकला, ताप यावर गुणकारी
4. ही भाजी खाल्ल्याने भूक वाढते आणि पचनक्रिया सुधारते.
हेही वाचा- पावसाळ्यात बाजारात येणारी शेवग्याची शेंग तुमच्या जीवनात घडवेल जादू, वाचा या भाजीचे दहा भन्नाट फायदे
आज आम्ही सांगितलेले रानभाज्यांचे फायदे ऐकून तुम्ही नक्कीच ह्या भाज्या खाण्याचा विचार कराल. त्यामुळे पावसाळ्यात केवळ भजी आणि मक्यावर ताव न मरता या रानभाज्या खाऊन स्वत: चे आरोग्य ही सुदृढ ठेवा.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2019 03:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

