Balasaheb Thackeray Jayanti 2020: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाची काही वैशिष्ट्ये

सुरुवातील मराठी भाषा, मराठी माणूस अशा मुद्यांवर अग्रही असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पुढे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. पुढे रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद वादात हिंदुत्ववादी नेता अशी प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या चाहत्यांनीही मग त्यांना 'हिंदुहृदयसम्राट' अशी उपाधी प्रेमाणे बहाल केली.

Balasaheb Thackeray Jayanti 2020: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाची काही वैशिष्ट्ये
Balasaheb Thackeray | (File Image)

Balasaheb Thackeray 94th Jayanti: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) म्हणजे एक दिलखुलास आणि तितकेच वादग्रस्त व्यक्तीमत्व. आपल्या दिलखुलासतेने असंख्य मित्र जोडणारे मात्र, व्यसापिठावरुन भाषण देताना याच मित्रांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवणारे. मूळचे व्यंगचित्रकार असणारे हे व्यक्तिमत्व एकाच वेळी पत्रकार, संपादक, राजकारणी आणि कलावंत असे बहुआयामी होते. ते थेट राजकारणी नव्हते परंतू, शिवसेना (Shiv Sena) नावाचा राजकीय पक्ष स्थापन करुन राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. सुरुवातील मराठी भाषा, मराठी माणूस अशा मुद्यांवर अग्रही असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पुढे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. पुढे रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद वादात हिंदुत्ववादी नेता अशी प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या चाहत्यांनीही मग त्यांना 'हिंदुहृदयसम्राट' अशी उपाधी प्रेमाणे बहाल केली. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्वावादी म्हटले असले तरी, त्यांना जातीपातीचे राजकारण फारसे मान्य नव्हते. पोटाला कधी जात नसते असे ते म्हणत. अशा या व्यक्तिमत्वाची आज 94 वी जयंती. त्यांच्या जयंतीदिनी ही काही खास वैशिष्ट्ये

'मार्मिक' व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे

Marmik-Weekly | (File Image)

बाळासाहेब ठाकरे हे हाडाचे व्यंगचित्रकार होते. ते राजकारणात आले नसते तरीही एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा व्यंगचित्रकार म्हणून त्यांची गणणा झालीच असती. त्यांच्या व्यंगचित्रांवर डेव्ही लो या व्यंगचित्रकाराचा प्रभाव होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनादरम्यान त्यांनी काढलेली व्यंगचित्रे ही प्रचंड बोलकी असत. आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी भल्याभल्यांना घायाळ केले. अगदी, माजी पंतप्रधान दिवंगत पंडीत नेहरू, मोरारजी देसाई यांना तसेच, यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील, मोहन धारीया, जॉर्ज फर्नांडीस, कॉम्रेड डांगे यांसारख्या नेतेही त्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांतून सुटले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी 'मार्मिक' हे मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहीक सुरु केले. या साप्ताहिकातून त्यांनी मराठी अस्मिता मराठी मनात जोमाने फुलवण्याचा प्रयत्न केला. मार्मिक साप्ताहिकात प्रसिद्ध झालेली व्यंगचित्रे शिवसेना स्थापनेसाठी महत्त्वची ठरली. कारण, शिवसेनेचा पाया घालण्यासाठी ही व्यंगचित्रे जनमानसात प्रचंड प्रभावी ठरली.

'सामना' करणारा पत्रकार बाळासाहेब ठाकरे

Samna | (File Image)

बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते तसेच पत्रकारही होते. मार्मिक साप्ताहीक आणि शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर पुढे त्यांनी दैनिक सामना हे वृत्तपत्र सुरु केले. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते. सामनाच्या माध्यमातून बाळासाहेब शिवसेना पक्ष आणि आपल्या विचारांची रुपरेषा शिवसैनिकांपर्यंत पोहोचवत असत. सामनातील लिखाण खास करुन संपादकीय हे भाषाशैलीचा एक नमूनाच असायचे. आजही सामनाची भाषा काही प्रमाणात तशीच असल्याचे पाहायला मिळते. सामनातील लेख अनेकदा वादग्रस्त ठरले. परंतू, शिवसेनेची भूमिका शेवटच्या शिवसैनिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सामना यशस्वी ठरला. सामनाचे संस्थापक संपादक आणि संपूर्ण हायातभर बाळासाहेब ठाकरेच राहील्याने एक पत्रकार म्हणूनही बाळासाहेबांकडे पाहिले जाते.

फर्डे वक्तृत्व

Balasaheb Thackeray | (Photo Credits-Facebook)

बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तृत्व म्हणजे भाषणकलेचा एक नमुनाच. आपल्या भारदस्त वक्तृत्वाने बाळासाहेब जनमानसावर गारुड टाकत. त्यांच्या भाषणाला मिळणारा प्रतिसाद पाहता खूपच कमी राजकीय नेत्यांना हे सुख अनुभवायला मिळाल्याचे दिसते. आपल्या भाषणात बाळासाहेब मराठी भाषेचाच पुरेपूर वापर करत. हास्यविनोद, व्यंग, उपहास, टीका, मिश्लिलता, टोमणे, वाक्यप्रचार, शब्दप्रयोग, अशा सर्व बाबींचा समावश बाळासाहेबांच्या भाषणात असे. (हेही वाचा, Balasaheb Thackeray Jayanti 2020: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पहा गाजलेली भाषणे (Video))

शिवसेना

Shivsena (Photo Credits: File Image)

बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 या दिवशी शिवसेना ही संघटना स्थापन केली. सुरुवातीला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा या संघटनेचा विचार होता. मात्र, संघटना स्थापन झाल्यानंतर अल्पावधीतच या संघटनेने मुंबई महापालिका निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आणि या सघटनेचे राजकीय पक्षात रुपांतर झाले. शिवसेनेचा बोलबाला पुढे इतका वाढला की, बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख म्हणून ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचे वलय होते मात्र त्यावर म्हणावे तसे शिक्कामोर्तब झाले नव्हते.मात्र, शिवसेना स्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यांतच म्हणजे ऑक्टोबर 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर एक जाहीर सभा घेतली. या सभेला मिळालेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शिवसेना आणि बाळासाहेब या दोन्हींवर शिक्कामोर्तब झाले.

Balasaheb Thackeray Jayanti:शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी Watch Video

दरम्यान, शिवसेना हा वेल दिवसेंदिवस महाराष्ट्र, भारत असा वाढत राहीला. राजकीय सत्ताही मिळवत राहीला. परंतू, हे सर्व होत असताना पत्न मिनाताई यांचे नधन, मुलगा बिंदुमाधव याचा आकस्मिक मृत्यू यांमुळे बाळासाहेब बरेच तुटले गेले. त्यातच पुतण्या राज ठाकरे याने शिवसेना सोडून काढलेला नवा पक्ष आदींमुळे बाळासाहेबांमधील हळवा माणूनस अधिकच दुखावला गेला. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून सोबत असलेले छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक असे लोकही शिवसेना सोडते झाले. त्यामळेही त्यांच्यातील राजकीय नेता काहीसा दुखावला गेला. दरम्यान, प्रकृतीअस्वास्थ्याच्या कारणामुळे बाळासाहेबांनी शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवली. उद्धव ठाकरे यांना पक्षाचे कार्याध्यक्ष बनवले. दरम्यान, 17 नोव्हेंबर 2012 या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2020 08:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).