Ahilyabai Holkar Jayanti 2020: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 295 व्या जयंती निमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनातील रोचक गोष्टी
Ahilyabai Holkar Jayanti 2020 (PC - File Image)

Ahilyabai Holkar Jayanti 2020: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांची आज 295 वी जयंती (Jayanti) सर्वत्र साजरी होत आहे. अहिल्यादेवींचा जन्म मे 31 इ.स. 1725 रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.

अहिल्याबाई या मल्हारराव होळकरांच्या सून होत्या. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ. स. 1754 मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. 12 वर्षांनंतर, मल्हारराव होळकर यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. (वाचा - Parents Day 2020 Messages: 'जागतिक पालक दिन' निमित्त मराठी Wishes, Greetings, Images, Messages शेअर करून आपल्या आई-वडिलांना Facebook, WhatsApp च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!)

एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट म्हटले आहे. याशिवाय इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून अहिल्याबाई यांची ओळख आहे.

अहिल्याबाई होळकर या न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अशा धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. अहिल्याबाईंनी आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ आणि अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. महाराणी अहिल्याबाई मधील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक आश्चर्यचकित होत असतं. अहिल्याबाईंनी महिलांची परिस्थिती बदलण्या करता प्रयत्न केले.