थंडीमुळे उत्तर प्रदेशात 68 जणांचा मृत्यू; 8 राज्यात 'रेड अलर्ट' जारी
Red alert in eight states (PC- PTI)

उत्तर भारतात तसेच महाराष्ट्रातील नागपूरसह विदर्भामध्ये थंडीची लहर आली आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशात या 8 राज्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआरसह अनेक राज्यात तापमानाचा पारा शून्यावर गेला आहे. थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. थंडीमुळे उत्तर प्रदेशमध्ये 68 जणांचा मृत्यू झाला आहे.

थंडीमुळे दिल्ली तसेच उत्तर भारतातील इतर राज्यात दाट धुकं पसरलं आहे. त्यामुळे 30 रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. धुक्यामुळे विमान उड्डाणालाही फटका बसला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीसह काही ठिकाणी 1 ते 3 जानेवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रचंड थंडीमुळे दिल्लीकरांना हुडहुडी भरली आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील थंडीने 118 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. दिल्ली तसेच उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये 1901 मध्ये अशाप्रकारच्या थंडीची लाट आली होती. रविवारी दिल्लीतील लोदी रोडवर 2.8, पालममध्ये 3.2, सफदरजंगमध्ये 3.6 तसेच आया नगरमध्ये 2.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. (हेही वाचा - Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात निच्चांकी तापमान 5.1अंश; पुढील 2 दिवसात पावसाची शक्यता)

 

उत्तर भारतातील राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील नागपूरसह विदर्भामध्ये थंडीची लहर कायम आहे. चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वात निच्चांकी तापामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच चंद्रपूरामध्ये सर्वात कमी म्हणजे 5.1 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.