Terrorist Attacks: देशात गेल्या तीन वर्षात झाले 1034 दहशतवादी हल्ले; 177 जवान शहीद
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

गेल्या तीन वर्षांत देशभरात एकूण 1034 दहशतवादी हल्ले (Terrorist Attacks) झाले आहेत आणि या हल्ल्यांमध्ये एकूण 177 जवान शहीद झाले आहेत. त्यापैकी 1033 हल्ले एकट्या जम्मू-काश्मीरमध्ये झाले तर एक हल्ला दिल्लीत झाला. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत झालेल्या हल्ल्यांपैकी 2019 मध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या सर्वाधिक 594 घटनांची नोंद झाली आहे. म्हणजेच 2019 मध्ये काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरही दहशतवादी घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही.

गेल्या वर्षी केंद्रशासित प्रदेशात 244 दहशतवादी हल्ले झाले होते, तर चालू वर्षात 15 नोव्हेंबरपर्यंत अशा 196 घटना घडल्या आहेत. दिल्लीतील अशाच एका घटनेचाही यादीत समावेश केल्यास, 2019 ते 2021 (नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत) देशात अशा एकूण 1,034 घटना घडल्या आहेत. भट्ट म्हणाले की, या काळात आतंकवादी कारवायांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) कर्मचार्‍यांसह एकूण 177 जवान शहीद झाले. (हेही वाचा: The Farm Laws Repeal Bill, 2021: लोकसभेमध्ये विरोधकांच्या गोंधळामध्ये कृषी कायदे रद्द करण्याबद्दलचं विधेयक मंजूर)

2019 मध्ये 80, 2020 मध्ये 62 आणि चालू वर्षात (15 नोव्हेंबरपर्यंत) 35 जवान शहीद झाले. दुसर्‍या प्रश्नाच्या उत्तरात भट्ट म्हणाले की, सरकारने किनारी, किनारपट्टी आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये सागरी सुरक्षा एजन्सींची क्षमता वाढवणे, किनारी आणि ऑफशोअर क्षेत्रांचे तांत्रिक निरीक्षण वाढवणे आणि आंतर-एजन्सी समन्वयासाठी यंत्रणा स्थापन करणे यांचा समावेश आहे.