Nirbhaya Gang Rape Case: दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला आज 8 वर्षे पूर्ण, आईने व्यक्त केली 'ही' खंत
Nirbhaya's mother Asha Devi. (Photo Credits: ANI)

संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी निर्भया सामूहिक बलात्कार (Nirbhaya Gang Rape Case) घटनेला आज 8 वर्षे पूर्ण झाली. या घटनेचा आजही केवळ विचार केला तरी अंगाचा थरकाप उडतो. निर्भया चेहरा, तिच्यावर झालेला अनैसर्गिक अत्याचार, तिची मरणापूर्वीची झालेली अवस्था, तिची मृत्यूशी अपयशी झालेली झुंज हे सर्व काही डोळ्यासमोर येते. या घटनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. ही घटना ऐकून जितका त्रास देशभरातील लोकांना झाला त्याहून कित्येक पटींनी तिच्या आईला झाला आहे. आपल्या मुलीची त्या नराधमांनी केलेली अवस्था आपल्या पोटच्या पोरीचे तोडलेले लचके पाहून त्या माऊलीची काय अवस्था झाली असेल याची कल्पना सुद्धा करता येणार नाही. तिच्या आईने या दिवशी आपल्या मनातील एक खंत मिडियासमोर बोलून दाखवली आहे.

'माझ्या मुलीसोबत झालेल्या भयंकर घटनेला आज 8 वर्षे पूर्ण झाली. माझ्या मृत मुलीला न्याय मिळाला मात्र त्यासाठी आम्हाला 8 वर्षे वाट पाहावी लागली. याबाबत सरकारी न्यायालयाने विचार करण्याची गरज आहे की इतका उशीर का झाला आणि त्यानुसार यासंबंधीच्या कायद्यात काही बदल करावेत.' अशी निर्भयाची आई म्हणाली.हेदेखील वाचा- Nirbhaya Convicts Hanged: निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींनी सांगितली होती 'ही' शेवटची इच्छा; फाशीपूर्वी तिहार जेल मध्ये काय घडलं जाणून घ्या

"माझ्या मुलीला जरी न्याय मिळाला असला तरीही मी शांत बसणार नाही. देशभरात होणा-या बलात्कारातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव लढत राहणार. त्याचप्रमाणे आता सर्वांनी एकत्र येऊन बलात्काराच्या घटनेविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे" असंही त्या यावेळी म्हणाल्या.

2012 दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Gangrape & Murder Case) चार ही दोषींना 20 मार्च 2020 रोजी सकाळी फासावर चढवण्यात आले. यानंतर देशभरात निर्भयाला सात वर्षांनी का होईना पण न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.