विधानसभाध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड
Nana Patole (Photo Credits-ANI)

राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झा्ल्यानंतर दोन दिवस विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. तसेच शनिवारी ठाकरे सरकारने विधानभवनात विश्वासदर्शक ठराव मंजूर करत त्यांना 169 आमदारांनी पाठिंबा दिला. त्याचसोबत विधानसभाध्यक्षपदासाठी भाजपकडून किसन कथोरे (Kisan Kathore)  आणि काँग्रेसकडून नाना पटोले (Nanabhau Patole) यांनी अर्ज भरला होता. त्यानंतर आज विधानसभाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार होती. याच पार्श्वभुमीवर भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अखेर नाना पटोले यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब झाले आहे.

विरोधी पक्ष भाजपने शनिवारी किसान कथोरे यांना विधानसभाअध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवले. तर काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली. या अध्यक्षपदासाठी निवडणूक बॅलेट पेपरच्या माध्यमातून करण्यात यावी अशी मागणी विधानभवनाच्या विशेष अधिवेशनात भाजपकडून करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ही निवडणूक खुल्या पद्धतीने करण्यात येणार होती. मात्र आता भाजपच्या किसान कथोरे यांनी अध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे नाना पटोले हे पुढील विधानसभाध्यक्षांच्या जागी दिसून येणार आहेत.(Maharashtra Government Formation Live Update)

ANI Tweet:

त्याचसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील हे महाराष्ट्र विधानसभेचे नवे हंगामी अध्यक्ष असणार आहेत. यापूर्वी भाजपचे आमदार कालिदास कोलंबकर यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. दिलीप वळसे पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक नावाजलेले नाव आहे, तसेच ते राज्य विधानसभेचे सभापती देखील राहिले आहेत.