Farmers Protest: अजून 8 महिने चालणार शेतकरी आंदोलन; राकेश टिकैत यांची माहिती
Farmers' protest in Delhi | (Photo Credits: PTI)

तीन नवीन कृषी कायद्यांविरुद्ध गेले चार महिने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. याआधी थंडीचा सामना करीत असलेले शेतकरी आता उन्हाची काहिली सहन करीत आहेत. अशात पुढील एक-दोन महिन्यात हे शेतकरी माघार घेतील अशा शक्यता वर्तवली जात होती. मात्र तसे होणार नाही. सध्या भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे तीन नवीन कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी, आजकाल देशाच्या विविध भागांत भेट देत आहेत. राजस्थान दौर्‍यादरम्यान माध्यमांशी बोलताना राकेश टिकैट म्हणाले की, आंदोलन करणारे शेतकरी दीर्घ लढयासाठी सज्ज आहेत आणि मागण्या मान्य झाल्यावरच ते माघार घेतील.

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सांगितले की, केंद्राने कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपीवर कायदेशीर हमी द्यावी. ते म्हणाले की, जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 16 राज्यांची वीज कपात केली जाईल. राकेश टिकैत यांनी गुरुवारी सांगितले की, ‘आंदोलन आणखी आठ महिने तरी चालेल. शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल. जर तसे झाले नाही तर त्याच्या जमिनी जातील. 10 मे पर्यंत शेतकरी गव्हाच्या पिकाची कापणी करतील आणि त्यानंतर आंदोलनाला वेग येईल. हे आंदोलन अद्याप बराच काळ चालणार आहे. आता आमचे बाहेरही कार्यक्रम होत आहेत.’ (हेही वाचा: Bank Merger: देशातील 10 बँकांचे एकत्रिकरण झाल्याने सामान्य माणसावर त्याचा कसा होईल परिणाम? जाणून घ्या सविस्तर)

दुसरीकडे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की, आंदोलन करणारे शेतकरी 10 एप्रिल रोजी केएमपी एक्स्प्रेस वे 24 तासांसाठी रोखून धरतील. किसान मोर्चाने असेही सांगितले की, आंदोलनकारी शेतकरी मे महिन्यात संसदेपर्यंत पायी मोर्चा काढतील, लवकरच याची तारीख निश्चित होईल. दरम्यान, गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरपासून राष्ट्रीय राजधानीच्या विविध सीमांवर नव्याने लागू करण्यात आलेल्या तीन शेती कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. 1 डिसेंबरपासून सरकार आणि शेतकरी यांच्यात वाटाघाटीची फेरी सुरू झाली. एकामागून एक, सरकार आणि सुमारे 40 शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये 11 फेऱ्या झाल्या. मात्र या सर्व बैठका अनिर्णीत ठरल्या.