नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात पश्चिम बंगाल हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना खास आमंत्रण, ममता दीदी मात्र फिरवणार पाठ
Mamta Banarjee To Avoid Narendra Modi Oath Taking Ceremony (Photo Credits: File Photo)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान पश्चिम बंगाल  (West Bengal) मध्ये उद्भवलेल्या हिंसाचाराच्या घटनेत काही भाजपा कार्यकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.मात्र उद्या म्हणजेच 30 मे रोजी राष्ट्रपती भवनात पार पडणाऱ्या पंतप्रधान शपथविधी सोहळ्यात या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे.पश्चिम बंगाल मधील भाजपा पक्षाचे उपाध्यक्ष जय प्रकाश मजुमदार (Prakash Majumdar)  यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंसाचारात बळी गेलेल्या 70 कार्यकर्त्यांचे कुटुंब बुधवारी दिल्लीसाठी रवाना होणार आहे त्यांच्या प्रवासाचा, राहण्याचा व खाण्यापिण्याचा खर्च हा पक्षाच्या निधीतून करण्यात येईल. पश्चिम बंगालच्या ममता दीदी (Mamta Banarjee) मात्र या सोहळ्याकडे पाठ फिरवणार असल्याचे समजत आहे.

अमित शहा यांनी आयोजित केलेल्या रोड शो दरम्यान हा मोठा हिंसाचार झाला होता ज्यामध्ये जवळपास 50 भाजपा कार्यकर्त्यांचा नाहक बळी गेला होता.यावरून भाजपा आणि स्थानिक पक्ष तृणमूल काँग्रेस मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान लावण्यात आलेल्या आरोपांचा निषेध म्हणून ममता दीदी मोदींच्या शपथविधी सोहळ्यापासून दूर राहणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. वास्तविक दृष्ट्या शपथविधी सोहळा हा औपचारिक कार्यक्रम असल्याने आपण या सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याचे ममता दीदी यांनी यापूर्वी सांगितले पण आता त्यांनी स्वतःच आपण जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 2014 मध्ये देखील ममता या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हत्या. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात 6000 देशी-विदेशी पाहुणे लावणार उपस्थिती, पाहुणचारासाठी 'अशी' केली जातेय तयारी

लोकसभा निवडणुकीत यंदा पश्चिम बंगाल मध्ये भाजपाला 2014 च्या तुलनेत 42 पैकी 18 जागा मिळाल्या आहेत. मृत कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रण देऊन 2021 मध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या मनात जागा मिळवण्याचा भाजपाचा विचार आहे अशा चर्चा सध्या सुरु आहेत.