Cyclone Yaas Updates:  'यास' चक्रीवादळ धोकादायक वळणावर; ओडिशा, पश्चिम बंगालसह इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा, NDRF लागले कामाला
Cyclone Yaas | (Photo Credits: Twitter/ANI)

देशाच्या पूर्व समुद्र किनारपट्टीवर यास चक्रवादळ (Cyclone Yaas) धडकण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा (Odisha), पश्चिम बंगाल (West Bengal) या प्रमुख राज्यांसह कनारपट्टीलगतच्या इतरही राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळ यास आज (24 मे 2021) ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडक देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवमान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत पूर्व मध्य समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पठ्ठ्यामुळे 'यास' वादळ निर्माण झाले आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास येत्या 12 तासात वारे अधिक वेगाने धावू लागतील. त्याचा परिणाम येत्या 24 तासात मोठ्या चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या खाडीत निर्माण झालेले चक्रिवादळ यासमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारी पातळीवर मोठी तयारी केली जात आहे.

चक्रीवादळ उत्तर उत्तर उत्तर पश्चिमेच्या दिशेने पुढे पुढे सरकत आहे. येत्या 24 तासात हे वादळ मोठ्या चक्रीवादळात परावर्तीत होण्याचा संभव आहे. भारतीय हवामान विभागाने हे चक्रीवादळ 26 मे या दिवशी मोठ्या चक्रीवादळात रुपंतरीत होईल. त्याचा फटका उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात होऊ शकेल, असे म्हटले आहे. (हेही वाचा, Cyclone Yaas Update: चक्रीवादळ 'यास' चा 'या' राज्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जाहीर)

चक्रीवादळ यासमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोलकाता शहरात 74 ठिकाणी पंपींग स्टेशन उभारण्यात आले आहे. तर ओडिशा राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये चक्रिवादळ यास बाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा-बंगाल राज्यांमध्ये NDRF पथकं तैनात करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने यास चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आदी राज्यांच्या मुख्यमंत्री आणि पुड्डचेरी राज्याच्या उपराज्यपालांसोब चर्चा केली.

दुसऱ्या बाजूला चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलही सक्रीय झाले आहे. हवाई दलाने NDRF पथकांसोबत एअरलिफ्ट केले आहे. जे कोलकाता, भूवनेश्वर आणि पोर्ट ब्लेयर सह इतर राज्यांमध्ये आहे. तर 26 हेलिकॉप्टर्स स्टॅंड बाय मोडवर ठेवण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास हे हेलिकॉप्टर मदतीसाठी सक्रीय होईल. याशिवाय भारतीय नौदलानेही मोठी तयारी सुरु केली आहे.