जून-जुलैमध्ये समोर येणार कोरोना विषाणूची सर्वाधिक प्रकरणे, शिगेला पोहचेल प्रादुर्भाव; AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया यांची माहिती

देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) आजाराला बळी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गुरुवारी देशात एकूण कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 52,952 वर पोहोचली आहे

जून-जुलैमध्ये समोर येणार कोरोना विषाणूची सर्वाधिक प्रकरणे, शिगेला पोहचेल प्रादुर्भाव; AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया यांची माहिती
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) आजाराला बळी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गुरुवारी देशात एकूण कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 52,952 वर पोहोचली आहे, तर संक्रमित 1783 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी 15,266 लोक बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, एम्सचे (All India Institute of Medical Sciences) संचालक रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी ही महामारी कळस गाठण्याबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. गुलेरिया म्हणाले आहेत की, जून-जुलै महिन्यात कोरोना विषाणूचे प्रमाण सर्वाधिक असणार आहे, म्हणजेच यावेळी कोरोनाच्या सर्वाधिक केसेस समोर येतील.

संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले की, ‘सध्याची आकडेवारी पाहिल्यास देशात ज्याप्रकारे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे, त्यावरून ही शक्यता आहे की जून आणि जुलैमध्ये या आजाराची पातळी वाढेल. देशाला लॉक डाऊनचा फायदा झाला आहे आणि लॉक डाऊनमुळेच कोरोनाची प्रकरणे फारशी वाढली नाहीत.’ तसेच त्यांनी पुढे असेही सांगितले की, हा विषाणू एकाच फेजमध्ये कमी होणार नाही, आपल्याला त्यासोबत जगावे लागेल. हळू हळू या विषाणूचे प्रमाण कमी होईल.

डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले की, ‘भारतात इतर देशांपेक्षा कमी प्रकरणे आढळली आहेत. रुग्णालयांनी लॉक डाऊनमध्येच आपली तयारी केली, डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले, पीपीई किट्स, व्हेंटिलेटर आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था केली गेली, कोरोना विषाणू रुग्णांचा तपास वाढवण्यात आला यामुळेच हे शक्य झाले.’ (हेही वाचा: लॉक डाऊननंतर पुन्हा ऑफिसला जाण्याबाबत 95 टक्के लोक चिंतेत; 59 टक्के कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे आरोग्याची चिंता - FYI सर्वेक्षण)

गेल्या 8 ते 10 दिवसात देशात कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, आता केसेस खूप वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत असा विश्वास आहे की पुढील महिन्यातील वेळ कठीण असू शकतो. गुरुवारी, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनीही कोरोनाच्या दीर्घ काळाविषयी भाष्य केले. ते म्हणाले की कोरोना बराच काळ थांबणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 07, 2020 06:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).