Surya Grahan 2019: ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण पाहण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता; कसा पाहाल हा अद्भूत नजारा
Solar Eclipse (Photo Credits: ANI)

54 वर्षानंतर भारतात आलेल्या सूर्यग्रहणास (Solar Eclipse) सुरुवात झाली असून हे पाहण्यासाठी सर्वांमध्येच उत्सुकता आहे. मात्र बुधवारपासून मुंबईत झालेल्या ढगाळ वातावरणामुळे ग्रहण पाहण्यासाठी आतुर असलेल्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या अनेक भागात पावसाचा शिडकावा झाला. हे ढगाळ वातावरण हा सकाळपासून कायम आहे. त्यामुळे हे ग्रहण पाहण्यासाठी उत्सुक असलेल्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये खंडग्रास ग्रहण सकाळी 8.04 वाजता सुरू होणार आहे, तर ग्रहण समाप्ती 10.55 वाजता होणार आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी धुलिकण आणि धुक्यामुळे ग्रहण दिसण्यात अडथळे येतील, अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.

2019 मधील शेवटच्या ग्रहणाचा कालावधी सुरु झाला असून सर्व लोकांमध्ये या ग्रहणाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. ग्रहणदर्शनासाठी मुंबईकरांनी विविध ठिकाणी खगोल अभ्यासक आणि तज्ज्ञांसोबत तयारीही केली होती. त्या तुलनेत केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी हे ग्रहण कंकणाकृती दिसेल. मंगळुरू, कोईमतूर, उटी, एरोड, तिरूचिरापल्ली येथे सौरकंकण दिसेल.

हेदेखील वाचा- Surya Grahan 2019: ग्रहणात गर्भवती महिलांनी कशी घ्यावी काळजी

कसे पाहता येईल हे ग्रहण:

ढगाळ वातावरण असले तरी सूर्यग्रहण नुसत्या डोळ्यांनी बघू नये, असा इशारा खगोलतज्ज्ञांनी दिला आहे. त्यासाठी खास सौरचष्म्याचा वापर करावा. सूर्यग्रहणात जमिनीवर पडणारे कवडसे सूर्याच्या आकाराचे अर्थात खंडग्रास दिसतात. त्यामुळे साधा, सपाट आरसा घेऊन भिंतीवर प्रतिमा पाडली तर ते सहज शक्य होईल व आपण सूर्यग्रहण बघू शकू, अशी माहिती खगोल मंडळाचे सचिव डॉ. अभय देशपांडे यांनी दिली.