Weather Effect on Rabi Season: द्राक्ष, आंबा, कांद्यासह रब्बी हंगामातील पिकांवरही थंड हवामानाचा वाईट परिणाम
Grapes | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात झालेल्या वातावरण बदलाचा मोठाच परिणाम शेतीवर (Weather Effect on Rabi Season) होतो आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांना फटका बसतो आहे. द्राक्षे (Grapes), कांदा (Onions), अंबा (Mangoes) या पिकांवर बुरशी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो आहे. तर तूर,बाजरी, मका, कापूस, भुईमूग, ज्वारी, हरभरा, सोयाबीन, भेंडी आदी पिकांवरही वाईट परिणाम होताना दिसतो आहे. पुढील काही काळ हे वातावरण कायम राहिल्यास मोठ्या आर्थिक नुकसानीस शेतकऱ्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तान आणि बलुचिस्तान येथून धुळ आणि वारे भारता प्रवेश करत आहे. त्यामुळे मुंबई, पुणे शहरांतील गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. वाहनांवर एक पांढऱ्या रंगाचा थर पाहायला मिळतो आहे. तर हवेतील गारठाही वाढला आहे. नागरिकांनाही चांगलीच हुडहुडी भरली आहे. मुंबईत तर विक्रमी थंडीची नोंद झाली असून, पारा निचांकी पातळीला पाहायला मिळाला आहे. (हेही वाचा, Cold Weather in Mumbai: मुंबई शहरात विक्रमी थंडी, तापमान16 अंशांवर, पुढचे तीन ते चार दिवस गारवा कायम राहणार- हवामान विभाग)

नाशिक हे द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वातावरण बदलाचा फटका पाहायला मिळतो आहे. नाशिकमधील कुंदेवाडी येथे निचांकी तापमान नोंदवले गेले आहे. या ठिकाणी 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घ्यावा लागतो आहे. शेतकरीही धास्तावला आहे. द्राक्ष पिकांना हवामानाच फटका बसल्यास निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.

दरम्यान, गहू, हरभरा, भाजीपाला, कांदा, द्राक्ष यांच्यावर हवामानाचा परिणाम होऊन बुरशी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रदुर्भाव वाढला आहे. या रोगांना नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकरी कीटकनाशक आणि बुरशीनाशक औषधांची फवारणी करत आहे. असे असले तरीही बुरशी, तांबेरा, करपा, भुरी, टिक्का, मावा, तुडतुडे या रोगांचे प्रमाण वाढण्याची चिन्हे अधिक आहेत.