Sanjay Raut On CM Eknath Shinde: 'आम्ही पुन्हा निवडून येऊ, भाजप आणि शिंदे गटाची युती तात्पुरती व्यवस्था'; संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा
Sanjay Raut (PC - ANI)

Sanjay Raut On CM Eknath Shinde: महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या युतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'आम्ही पुन्हा निवडून येऊ, भाजप आणि शिंदे गटाची युती तात्पुरती व्यवस्था आहे,' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. बंडखोर आमदार जनतेसमोर जाऊ शकत नाहीत. शिवसेनेत असताना ते वाघ होते. पण, आता भीतीपोटी सुरक्षेसह फिरत आहेत. कसाबलाही इतकी सुरक्षा देण्यात आली नव्हती जितकी, बंडखोर आमदाराला देण्यात आली होती. तुम्हीला कशाची भीती वाटत आहे? तूम्ही का घाबरत आहात? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.

आमचा पक्ष कमकुवत होणार नाही. ऑक्सिजन ही आमची ताकद नाही. आम्ही ताकदवान आहोत म्हणून आम्ही सत्तेत आहोत. लोक येतात आणि जातात, असंही राऊत यावेळी म्हणाले. बंडखोर नेत्यांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतला. मात्र, बाहेरील शक्तींमुळे पक्ष सोडला. आम्ही गावोगावी जाऊ, इतर लोकांना आमच्या पक्षात सहभागी करून घेऊ. आम्ही पुन्हा निवडून येऊ याची खात्री आहे, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. (हेही वाचा - Eknath Shinde Govt Floor Test: अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्याह काँग्रेसच्या पाच आमदारांनी विश्वासदर्शक ठरावात नाही केले मतदान, जाणून घ्या कारण)

सूडबुद्धीने आमचा पक्ष फोडण्यात आला -

सूडबुद्धीने आमचा पक्ष फोडण्यात आल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केला. पक्ष कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमदारांचे जाणे तात्पुरते आहे. धोका मिळाल्यानंतर ते पुन्हा मूळ पक्षात परततील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज फ्लोर टेस्टमध्ये आपले बहुमत सिद्ध केले. यासह आता एकनाथ शिंदे यांचे सरकार अबाधित राहणार हेही निश्चित झाले आहे. फ्लोअर टेस्टमध्ये शिंदे यांच्या बाजूने 164 मते पडली. 99 आमदारांनी विरोधात मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सात आमदारांनी मतदानात भाग घेतला नाही.