वर्धा लोकसभा मतदारसंघ: रामदास तडस विरुद्ध चारुलता टोकस सामना रंगणार; भाजप - काँग्रेस संघर्षात कोण मारणार बाजी?
BJP Candidate Ramdas Tadas And Congress Candidate Charushila Tokas | (Photo Credits-Twitter & Facebook)

Lok Sabha Elections 2019: अमरावती जिल्ह्यातील 2 आणि वर्धा जिल्ह्यातील 4 अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होऊन तयार झालेल्या लोकसभा मतदारसंघ म्हणजे वर्धा. हिंदू, मुस्लीम, बौद्ध समाजाचे प्राबल्य असले तरी ख्रिश्चन, जैन, शीख, या पंथातील मतदारांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर असलेला असा हा सामाजिक एकोपा जपणारा मतदारसंघ. वर्धा लोकसभा मतदारसंघ (Wardha Lok Sabha constituency) आणखी एक वैशिष्ट्य असे की, या मतदारसंघात मराठी, हिंदी भाषांसोबतच गुजराती आणि सिंधी भाषा बोलणाऱ्या मतदारांची संख्याही मोठी आहे. अशा या मतदारसंघात भाजप उमेदावर (BJP Candidate) विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) विरुद्ध काँग्रेस उमेदवार (Congress Candidate) चारुलता टोकस (Charushila Tokas) अशी प्रमुख लढत असेल.

तडस यांच्या जमेच्या बाजू

रामदास तडस हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे खासदार फंडातून विविध विकासकामं करण्यात तडस हे बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले आहेत. जसे की, वर्धा येथील पासपोर्ट कार्यालय, विविध स्टेशनवर रेल्वेचे थांबे, सिंचन योजनेतील मार्गी लावलेली कामे अशा विविध गोष्टी तडस यांची बाजू सावरण्यास महत्त्वाच्या ठरतात. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांनी जर पंतप्रधान मोदींकडे पाहून मतदान केल्यास त्याचाही फायदा तडस यांना मिळू शकतो. (हेही वाचा, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे विरुद्ध भाजपचे सुनील मेंढे; सामना रंगणार)

रामदास तडस यांच्यासाठी धोक्याच्या बाजू

तडस यांच्यासाठी काहीशी धोक्याची बाजू अशी की, 2014 मध्ये मतदारांनी भाजपला भरभरून यश दिले असले तरी, आता परिस्थिती बरीच बदलली आहे. ग्रामिण भागातही मुसंडी मारणाऱ्या भाजपला ग्रामिण भागातूनच विरोध होऊ लागला आहे. वर्धा जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल अलिकडेच लागला. त्यावर नजर टाकता काँग्रेसने जवळपास भाजपच्या बरोबरीने ग्रामपंचायत निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे मतदार पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळल्याचेही चित्र आहे.

दुसरे असे की, भाजपचं संघटन मजबूत असलं तरी, बेरोजगारी, एमआयडीसी, रोजगारनिर्मिती, शेतमालाला हमीभाव याबाबतीत दिलेली अश्वासनं भाजप आणि खासदार तडस यांना पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्ग बऱ्याच प्रमाणावर नाराज आहे. त्यामुळे ही नाराजी तडस कशी दूर करतात हेही पाहावे लागणार आहे. (हेही वाचा, मावळ लोकसभा मतदारसंघ: पार्थ पवार यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजयासाठी ही आहेत आव्हानं)

चारुलता टोकस यांच्या जमेच्या बाजू

काँग्रेसच्या दिवंगत नेत्या प्रभा राव यांच्या कन्या असे वलय चारुलता टोकस यांच्या मागे आहे. त्यामुळे या वलयाचा फायदा टोकस यांना मिळू शकतो, असे स्थानिक राजकारणातील विश्लेषक सांगतात. दुसरे म्हणजे हा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत सत्तेची भाकरी सतत फिरवताना दिसतो. त्यामुळे एकदा निवडूण दिलेल्या उमेदवाराला शक्यतो दुसऱ्यांदा संधी मिळत नाही. वर्धा लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. 2014 आणि त्या आधीच्या काही निवडणुकांमध्ये अपवाद वगळता इथला मतदार काँग्रेस सोबतच राहिला आहे. त्यामुळे काँग्रेसचा मूळ मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे. या मतदाराला आकर्षित करु शकल्या तर, टोकस यांना चांगला फायदा मिळू शकतो.

चारुलता टोकस यांच्यासाठी अडचणीच्या बाबी

खरे म्हणजे, चारुलता तडस यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे खरे. पण, त्यांचा या मतदारसंघात मातोश्री प्रभा राव यांच्याइतका लोकसंपर्क नाही. दोन वर्षांपूर्वी त्या वर्ध्याला आल्या. राहण्यासाठी त्या दिल्लीला असतात. त्यांची शेती इथं आहे. त्यामुळे आपल्या शेतीसाठी आपण नेहमी इथे येत असतो, असा त्यांचा दावा असतो. तसेच, जिल्हा परिषद अध्यक्षा असताना आपण इथे होतो. आता आपण निवडूण आल्यास पुन्हा एकदा आपण पूर्णवेळ वर्ध्यात राहू असेही त्या सांगतात. पण, त्यांचा शब्द मतदारांना किती भावतो हे पाहणे महत्त्वाचे. त्यात काँग्रेसला नेहमी प्रमाणे गटातटानेही ग्रासले आहे. या गटातटांना टोकस कशा सोबत घेऊ शकतात हे पाहणेही महत्त्वाचे.