BMC Elections 2022: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना एकटी लढणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sonia gandhi | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Elections 2022) नेहमीच प्रतिष्ठेची राहिली आहे. त्यामुळे आता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना एकटी लढणार की आणखी कोणाला सोबत घेऊन लढणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारचे (Maha Vikas Aghadi) नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्राचे सरकार स्थिर असून सत्ताधारी महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसह सर्व निवडणुका एकत्र लढवतील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करून शनिवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, अगामी मुंबई महानगरपालिकची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसह सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमचे सरकार स्थिर आहे. युतीतील भागीदार वैचारिकदृष्या भिन्न असल्याचे मानले जाते आहे. परंतु, राज्याचे हित आणि लोकहिताने तीन पक्षांना एकत्र बांधले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- CM Uddhav Thackeray Abhinanadan Mulakhat: केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, कुटुंबावरील वरील आरोप ते सत्तांतराचे प्रयत्न यावर काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. शिवसेनेने धोरणात्मक बाबींवरून भाजपवर टीका केली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना लक्ष्य केले नाही. तसेच हिंदुत्वाची माझी व्याख्या बदललेली नाही. ती सुसंस्कृत आहे, भाजपप्रमाणे विकृत नाही. हिंदुत्वात संस्कृती खूप महत्वाची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार आहेत, अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतच राहणार आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.