'BMC डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस बंद करावी', Nair Hospital मधील निष्काळजीपणा नंतर नगरसेवकांमध्ये संताप
REpresentational Image (Photo credits: Unsplash.com)

सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या चार महिन्यांच्या मुलाचा सोमवारी मुंबईच्या (Mumbai) नायर रुग्णालयात (Nair Hospital) मृत्यू झाला. उपचारात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली बीएमसीने नायर रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. अशाप्रकारे नायर रूग्णालयात रुग्णांकडे डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजप आणि सपाने रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीएमसी डॉक्टरांना वेतन देते, मात्र हे डॉक्टर बीएमसी रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्याकडे लक्ष देता त्यांच्या खासगी प्रॅक्टिसकडे जास्त लक्ष देत आहेत. त्यामुळेच डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवर बंदी घालावी, जेणेकरून बीएमसी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार मिळू शकतील, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बीएमसीचे विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणाले की, दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. बीएमसी रुग्णालयांमध्ये असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.

तत्पूर्वी, भाजप नगरसेवकांनी नायर रुग्णालयाला भेट देऊन अचानक पाहणी केली, त्यात बहुतांश एचओडी ओपीडीमध्ये नसल्याचे आढळले. याचा निषेध करत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीची सभा तहकूब करण्याचे पत्र दिले. सभा सुरू होताच सभागृह नेत्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी नायरच्या मुद्द्यावरून सभा स्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर या विषयावर चर्चा झाली.

अशा निष्काळजीपणामुळे बीएमसीची प्रतिष्ठा डागाळत असल्याचे राऊत म्हणाल्या. रवी राजा म्हणाले की, अशी घटना पहिल्यांदाच समोर येत नाहीये. यापूर्वीही बीएमसी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. नायर रुग्णालयातील दोषींवर फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. (हेही वाचा: मुंबईतील महिलेला अज्ञाताने 39 लाखांचा घातला गंडा, आरोपीवर फसवणूकीचे 8 गुन्हे दाखल)

भाजपचे प्रभारी शिंदे यांनी शिवसेनेवर टीका करत म्हटले की, ‘त्यांना फक्त पेंग्विन दिसतात. पेंग्विनच्या संगोपनावर दररोज दीड लाख रुपये खर्च केले जात आहेत, मात्र एका बालकाचा मृत्यू होत असून त्याला आर्थिक मदत देण्याबाबत कोणीही बोलत नाही. बीएमसी दरवर्षी आरोग्य सेवेवर 4500 कोटी रुपये खर्च करते, मात्र रुग्णालयांचे वास्तव हे आहे.’