पार्थ पवार केवळ निमित्त शरद पवार यांना राष्ट्रवादीतूनच आव्हान मिळते आहे काय?
NCP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी (CBI Enquiry) व्हावी ही मागणी असो किंवा थेट जय श्रीराम म्हणत अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे स्वागत असो. एकापाठोपाठ एक अशी पक्षविरोधी भूमिका मांडणाऱ्या पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तीव्र शब्दात सुनावले. तसेच, पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थकांनाही कडक शब्दात इशारा दिला. पण असे असले तरी नेहमी संयमी राजकारण आणि वक्तव्य करणाऱ्या शरद पवार यांना आपल्याच कुटुंबातील पक्ष सदस्याबद्दल असे तीव्र शब्द का वापरावे लागले असतील हा प्रश्न निर्माण होतोच. या प्रश्नाच्या माध्यमातून शरद पवार यांनाच राष्ट्रवादीतूनच आव्हान मिळते आहे की काय असाही नाव प्रश्न चर्चेत येऊ शकतो.

पार्थ पावार हे असमंजस (इमॅच्युअर) आहेत. त्यांच्या मताला काडीचीही किंमत नाही असे शरद पवार म्हणाले. या विधानास गेल्या काही काळात पार्थ पवार यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया कारणीभूत आहेत. पार्थ पवार यांनी 'अयोध्येत श्री राम. श्रीराम हे भारतीय अस्थेचे प्रतिक आहे. सांस्कृतिक ओळख आहे. आता अयोध्येत ते शांततेने राहतील' अशा आशयाचे एक पत्र ट्विट केले होते. राम मंदिर आणि एकूणच प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सावध प्रतिक्रिया व्यक्त करत आला आहे. इतकेच नव्हे तर उजव्या विचारांचे राजकारण टाळत नेहमी सर्वसमावेशक राजकारणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांचे राम मंदिराबाबतचे भाष्य पक्षाच्या चौकटीत बसणारे नव्हते. (हेही वाचा, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पार्थ पवारच्या CBI चौकशीच्या मागणीवर शरद पवारांची प्रतिक्रिया )

दुसऱ्या बाजूला पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली. पार्थ यांची ही मागणीसुद्धा पक्षाची भूमिका नव्हती. त्यामळे पक्षाची भूमिका नसताना आणि त्यातही राज्याचे गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतानाही पार्थ पवार यांनी ही भूमिका मांडली. पार्थ पवार यांच्या दोन्ही भूमिकांमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावर भाष्य करणे आवश्यक होते. राष्ट्रवादीच्या खासदार आणि पार्थ पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी आणि पक्ष प्रवक्ते नबाब मलिक यांनी शब्दांची कसरत करत यावर प्रतिक्रिया दिली. मात्र, आज खुद्द शरद पवार यांनीच यावर प्रतिक्रिया दिली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चर्चा झाल्याची माहिती.

पार्थ पवार यांची विधाने पाहता त्यांनी ती उगाचच केली आहेत असे मानता येणार नाही. कारण पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवोदित नेते असले तरी पहिल्यांदा ते पाक्षाचे महत्त्वपूर्ण नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. इतकेच नव्हे तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार राहिले आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या कोणत्याही विधानाला एक विशेष असे महत्त्व असते. इतकेच नव्हे तर अजित पवार यांच्याही काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत पार्थ यांना माहिती असते. जसे की अजित पवार यांनी बंड करुन भाजपसोबत पाहाटे शपथविधी केला होता. तेव्हा अजित पवार हे कोणाच्याही संपर्कात नव्हते. ते केवळ पार्थ यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे पार्थ यांच्या भूमिकेकडे अधिक गंभीरपणे पाहावे लागते. Sushant Singh Rajput Case: राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु करावी; पार्थ पवार यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी.

दरम्यान, पार्थ पवार यांची एकूणच राजकीय कारकीर्द पाहता ती फार मोठी नाही. थेट लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली. ही सुरुवात करुन देण्यात सहाजिकच अजित पवार यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांची भूमिका ही त्यांची स्वत:ची भूमिका असते की, त्याला पक्षाती अथवा आणखी इतर काही मंडळींचा पाठिंबा असतो असा प्रश्न निर्माण होतो. राजकीय वर्तुळात असेही बोलले जात आहे की, पार्थ पवार हे स्वत:च्या हिमतीवर कधीच अशी भूमिका घेणार नाहीत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच कोणाकडून पाटबळ मिळते आहे काय? असा सवाल निर्मण होतो. तसे असेल तर या प्रश्नातून आणखी एक नवा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे थेट शरद पवार यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आव्हान मिळते आहे की काय? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल.