गुजरातमधील (Gujarat) मोरबी (Morbi) तालुक्यातील वीरपर्डा (Virparda) गावात एका शेतकऱ्याच्या विहिरीत गेल्या काही दिवसांपासून पाणी लाटांसारखे हलत असल्याची विचित्र घटना समोर आली आहे. या रहस्यमय प्रकाराने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले असून, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडीयातही या वायरल व्हिडिओची चर्चा सुरू आहे.

विहिरीत लाटांसारखी हालचाल म्हणजे काय घडले?

#WATCH | Morbi, Gujarat: An unusual incident has been reported in Virparda village, Morbi taluka, where a farm well has been showing wave-like movement. The District Collector has ordered a detailed report from the groundwater research team.

प्राणजीवनभाई सराडिया या शेतकऱ्याच्या शेतात मान्सूनपूर्वी सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही विहीर खोदण्यात आली होती. यंदा चांगला पाऊस झाल्याने विहीर पाण्याने भरली. मात्र काही दिवसांपासून या विहिरीतील पाणी वारंवार गढूळ होत असून, त्यात लाटांसारखी हालचाल दिसून येत आहे. मंगळवारी ही हालचाल काहीशी कमी झाली होती, परंतु बुधवारी सायंकाळी पुन्हा सुरू झाली. या असामान्य प्रकारामुळे वीरपर्डा तसेच आसपासच्या गावांतील मोठ्या संख्येने नागरिक ही विहीर पाहण्यासाठी येत असून, हा परिसर स्थानिकांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे.

प्रशासनाकडून तातडीने पावले

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी स्वप्नील खरे यांच्या सूचनेनुसार जिल्हा भूगर्भशास्त्रज्ञ जगदीश वाढेर यांनी गुरुवारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक पाहणी केली. सोशल मीडियावर या विहिरीबाबत विविध चर्चा आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी खरे यांनी सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार पाण्याखाली अडकलेल्या हवेमुळे ही हालचाल होत असण्याची शक्यता आहे. अडकलेली हवा स्थान बदलत असताना पाण्याच्या पृष्ठभागावर हालचाल निर्माण होते, असे प्राथमिक निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे.

भूकंपाच्या शक्यतेस नकार

नागरिकांमध्ये या घटनेमागे भूकंपीय हालचाल किंवा भूगर्भातील हालचालींची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली होती. यामुळे प्रशासनाने राज्य भूकंपशास्त्र विभागाकडूनही तातडीने तांत्रिक अहवाल मागवला. गांधीनगर येथील भूकंपशास्त्र संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ ते दहा दिवसांत मोरबी जिल्ह्यात कोणतीही भूकंपीय हालचाल नोंदवली गेलेली नाही, तसेच परिसरात सक्रिय भ्रंश रेषाही (फॉल्ट लाइन) आढळलेली नाही.

सविस्तर अभ्यासासाठी विशेष पथक

पाण्याची हालचाल सुरूच असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात भूजल संशोधन संस्थेच्या (जीडब्ल्यूआरआय) तज्ज्ञांना घटनास्थळाची सविस्तर पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या संस्थेचे विशेष पथक लवकरच स्थळावर जाऊन भूजल आणि मातीच्या स्थितीचा अभ्यास करणार आहे. या पथकाकडून सविस्तर अहवाल सादर केला जाणार असून, त्यानंतर या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

जिल्हाधिकारी खरे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्यातरी चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, तज्ज्ञांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच या घटनेचे नेमके कारण समोर येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.