नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: सावनेर ते हिंगणा चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून
Nagpur Matadarsangh 2019 (Photo Credits: File)

महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत विदर्भाला कायम महत्त्वाचं स्थान राहिले आहे. विदर्भातलं सगळ्यात मोठं शहर नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे साहजिकच विदर्भाला राजकीयदृष्ट्या महत्व आहे. एकूण 288 जागांपैकी 62 जागांवर वैदर्भीय जनता त्यांचे प्रतिनिधी निवडून देते. भारतातल्या 9 राज्यात असलेल्या एकूण मतदारसंघापेक्षा जास्त मतदारसंघ फक्त विदर्भात आहे. 2014 साली मुख्यमंत्रीपद मिळवणारे देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)हे देखील याच जिल्ह्यातील होते. त्यामुळे यंदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महत्वाची अशी मानली जात आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भाजपाने जोरदार मुसंडी मारत 2014 साली काँग्रेसचा अगदी सपाटून पराभव केला होता. तेच चित्र यंदाही पाहायला मिळेल की काँग्रेस पक्ष हे चित्र बदलून टाकेल हे येणा-या काही दिवसात कळेलच.

नागपूरात 2014 साली विधानसभा निवडणुकीत सावनेरचे विद्यमान आमदार सुनिल छत्रपाल केदार (Sunil Kedar) सलग तिस-यांदा निवडणूक आले होते. 1995 साली सुनील केदार यांनी पहिल्यांदा अपक्ष उमेदवारी लढवली होती. ती निवडणूक त्यांनी जिंकली. मात्र, 1999 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि भाजपला पहिल्यांदा या मतदारसंघातून सत्ता मिळाली. त्यानंतर 2004 निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. तेव्हापासून आतापर्यंत फक्त सुनिल केदार यांचीच या मतदारसंघात सत्ता आहे. त्यामुळे यंदाही भाजपचे सुनील केदार विरुद्ध काँग्रेसचे राजीव पोतदार (Rajeev Potdar) हा सामना पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा- नागपूर: मतदानाचा हक्क बजवा आणि पेंच मध्ये MTDC रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये 25 टक्के सूट मिळवा!

तसेच काटोल मध्ये भाजपचे चरणसिंह ठाकूर (Charan Singh Thakur) विरुद्ध काँग्रेसचे शेखर शेंडे (Shekhar Shende) ही लढत पाहायला मिळेल. 2014 साली राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजप च्या डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) यांनी 70 हजार 344 एवढी मते घेत विजय मिळवला होता. मात्र भाजपवरील नाराजीळे त्यांनी 2018 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच 2009 पासून भाजपचीच सत्ता असलेल्या हिंगणा मतदारसंघात यंदा भाजपचे समीर मेघे (Sameer Meghe) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय घोडमारे (Vijay Ghodmare) हा सामना रंगणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत समीर मेघे यांनी पहिल्यांदा उमेदवारी लढवली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांचा भरघोस मतांनी विजय झाला होता.

नागपूर मधील उमरेड मतदारसंघात भाजपचे सुधीर पारवे (Sudhir Parve) विरुद्ध काँग्रेसचे राजू पारवे (Raju Parve) ही लढत पाहायला मिळेल. 2009 पासून या मतदारसंघात भाजपची सत्ता आहे. तर कामठी मतदारसंघात 2004 सालापासून सलग तिस-यांदा निवडून आलेले भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलत यंदा टेकचंद सावरकर (Tekchand Savarkar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत काँग्रेसचे सुरेश भोयर (Suresh Bhoir) यंदा बाजी मारणार की पुन्हा भाजपचीच सत्ता येणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

रामटेकमध्ये निवडून येणारे द्वारम मल्लिकार्जुन रामी रेड्डी (Dwaram Mallikarjun Reddy) भाजपचे पहिले खासदार आहेत. रेड्डी 2007 ते 2009 भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी होते. 2014 साली त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यामुळे यंदाची द्वारम रेड्डी हे रामटेक मतदारसंघात भाजपची जागा निवडून आणणार का की काँग्रेसचे उदयसिंग यादव (Udaysingh Yadav) बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकसभेत भाजपला मिळालेलं घवघवीत यश आणि काँग्रेसची ढळलेली ताकद यामुळे मुद्द्यांपेक्षा राजकीय पक्षांच्या स्थितीवर ही निवडणूक लढवली जात आहे, असं एकूणच चित्र विदर्भात पहायला मिळतं.