मुंबई मधील COVID 19 च्या स्थितीबद्दल आदित्य ठाकरे यांनी शेअर केली मोठी दिलासादायक माहिती; सोबत नागरिकांना '3' गोष्टींबाबत अजुनही सजग राहण्याचा सल्ला!
Aaditya Thackeray| Photo Credits: Twitter

जगभरात घोंघावत असलेले कोरोना वायरसचे संकट अजूनही कायम आहे. मात्र आता भारतासोबतच देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेले महाराष्ट्र राज्य आणि त्यातही आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) शहरातील कोरोनाचा धोका आता हळूहळू ओसरत आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नसले तरीही नव्याने रूग्णांचे निदान होण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना रूग्ण दुप्पटीचा दर आता 100 च्या पार म्हणजेच 102 झाला आहे. तर मुंबईत रूग्ण वाढीचा दर हा 0.69% आहे. मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. मात्र यावेळीच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नागरिकांना नियमित हात धुणे, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा ही त्रिसुत्री पाळण्याचं पुन्हा आवाहन केले आहे. Mumbai Police Logical Puzzle: कोरोना व्हायरस जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांनी ट्विटरवर घातले कोडे 'Crack the Code'.

मुंबईत सध्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 245871 पर्यंत पोहचला आहे. तर काल रात्री बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, 19,245 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. देशामध्येही कोरोना रूग्णवाढी बददल दिलासादायक चित्र आहे. देशामध्ये एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्ण मागील सलग 3 दिवस एकूण पॉझिटीव्ह रूग्णांच्या तुलनेत 10% पेक्षाही कमी झाली आहे.

मुंबईमध्ये महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंंतर्गत व्यवहार पुन्हा सुरू करताना गणेशोत्सवाच्या दिवसांंनंतर कोविड 19 च्या परिस्थिती गांभीर्याने घेणं कमी केले होते. परिणामी मुंबईत रूग्ण दुप्पटीचा दर पुन्हा खालावला होता पण त्यानंतर पालिकेच्या आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश आलं आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत पुन्हा जनजागृतीचं आणि आरोग्य तपासणीचं काम सुरू झालं आहे.

मार्च महिन्यापासून वाढता कोरोनाचा प्रभाव पाहता मुंबई लोकल सह अनेक सार्वजनिक ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत. काल (21 ऑक्टोबर) पासून पहिल्यांदाच सामान्य महिल्यांना गर्दीच्या वेळा टाळत मुंबई लोकलची परवनगी देण्यात आली आहे. तर येत्या काही दिवसांत मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. लवकरच त्याची घोषणा होईल असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे या सार्‍याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निवळत असलेली स्थिती दिलासादायक आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वीच लॉकडाऊन उठवला असला तरी कोरोना गेलेला नाही याचं भान ठेवत काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.