University Final Year Exams रद्द करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं राज्यापला भगतसिंह कोश्यारी यांना पत्र
MNS President Raj Thackeray | (File Image)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray)  यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांना पत्र लिहीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा (University Final Year Exams)  रद्द करावी अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता संसर्ग पाहता सद्य स्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षांचा हट्ट कशासाठी आणि कोणासाठी केला जातोय? या महामारीच्या काळात लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर निघण्यास सांगून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांची मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात घालण्याची गरज आहे का? असे सवालही राज ठाकरे यांनी पत्रातून केले आहेत. परीक्षांच्या बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते मात्र आता मे महिना सुद्धा संपत आला तरी याबाबत निर्णय होत नाहीये असे करून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य काळोखात टाकू नये अशी विनंती राज यांनी कोश्यारी यांना केली आहे. Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, नाशिकसह जाणून घ्या महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या, पाहा आजचे ताजे अपडेट्स

एकीकडे राज यांनी परीक्षा रद्द करण्याची विनंती केली असतानाच याचा अर्थ म्हणजे सर्वांना सरसकट पास करणे असा होत नाही हे सुद्धा स्पष्ट केले आहे. मागील सेमिस्टरच्या गुणांवर तसेच आता घरून करता येतील असे काही प्रोजेक्ट्स देऊन परीक्षा व्हाव्यात पण त्यासाठी घराबाहेर पडून लेखी परीक्षा देण्याचा हट्ट करू नये असेही राज यांनी म्हंटले आहे. राज यांच्या पत्रावर आता राज्यपाल कोश्यारी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे गरजेचे आहे.

राज ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

दरम्यान, महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलगुरू या नात्याने भगतसिंह कोश्यारी याबाबत काय निर्णय घेतील याकडे मागील अनेक दिवसांपासून सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे मात्र अद्याप कोणताही निर्णय समोर आलेला नाही. यापूर्वी उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा यूजीसीला पत्र लिहून पहिल्या आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचाही परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. तर दुसरीकडे अनेक शिक्षण तज्ञांनी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पास केल्यास त्यांच्या पदवीला किंमत उरणार नाही असेही मत व्यक्त केले होते.