Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती, सात हजार पदे; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती, घ्या जाणून
Police | (File Photo)

Maharashtra Police Recruitment: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकार राहणार की जाणार? असा राज्य सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका बाजूला राज्यात राजकीय अस्थिरता आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्येही जोरार हालचाली सुरु आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मात्र महत्त्वपूर्ण निर्णयांचा सपाटा लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आजच (28 जून) पार पडली. या बैठकीनंतर माहिती देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले की, राज्यात लवकरच पोलीस भरती (Maharastra Police Bharati Latest News) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस भरती 2022. या आधीही या भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी काही बदल आवश्यक होते. त्यानुसार आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आल्याचेही गृहमंत्री म्हणाले.

दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असल्याची माहितीही या वेळी दिली. काय आहेत हे बदल आणि कशी पार पडेल भरती प्रक्रिया? घ्या जाऊन

भरती प्रक्रियेसाठी प्रथम शारीरिक चाचणी पार पडेल. चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. (हेही वाचा, Agniveer Recruitment 2022: नौदलात अग्निवीरांच्या भरतीसाठी 1 जुलैपासून अर्ज करता येणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक)

शारीरिक चाचणी परीक्षा

पुरुषांसाठी (गुणदान प्रक्रिया)

  • शारीरिक चाचणी परीक्षा 50 गुणांची असेल
  • पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण)
  • 100 मीटर धावणे (15 गुण)
  • गोळाफेक (15गुण)

    एकूण- 50 गुण

महिलांसाठी (गुणदान प्रक्रिया)

  • 800 मीटर धावणे (20 गुण)
  • 100 मीटर धावणे (15 गुण)
  • गोळाफेक (15 गुण)

    एकूण- 50 गुण

दरम्यान, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी राबवली जाणारी प्रक्रिया पुढीलप्रमाणे.

  • शारीरिक चाचणीसाठी एकूण 100 गुणांची परीक्षा होईल.
  • या परीक्षेत पुरुष उमेदवारांसाठी 5 किमी धावणे (50 गुण)
  • 100 मीटर धावणे (25 गुण)
  • गोळाफेक (25 गुण)

    एकूण- गुण 100

दरम्यान, जे उमेदवार चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवतील ते संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत. घेतल्या जाणाऱ्या लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण आदी विषयांवर आधारीत प्रश्न विचारले जातील. याशिवाय या चाचणीत विचारले जाणारे प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारात मोडणारे असतील.

परीक्षेसाठी संपूर्ण माध्यम हे मराठी असणार आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मनिटांचा असेल. लेखी परीक्षेत उमेदवारांनी किमान 40% गुण प्राप्त करणे आवश्यकआहे. लेखी परीक्षेत 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरविले जातील. सदर पोलीस भरतीमध्ये लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

शारीरिक व लेखी मध्ये मिळवलेल्या गुणांचे एकत्रिकरण करून पोलीस महासंचालक यांनी प्रत्येक पोलीस घटकासाठी गठीत केलेले निवड मंडळ अंतिम गुणवत्ता यादी तयार करेल. नव्या दुरुस्तीमुळे पोलीस दलाला अधिक ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याबाबत चागला फायदा होईल असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.