लातूर, जालना, अमरावती, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक निकाल 2020; पाहा कुठे महाआघाडी विजयी, कुठे भाजपचा झेंडा
Electoral symbols of BJP, Shiv Sena, Congress, NCP | (Photo Credits: File Image)

Latur, Jalna, Amravati, Wardha Zilla Parishad Presidential Election Results 2020: राज्यभरात विविध जिल्हा परिषद निवडणुका पर पडत आहेत. त्यातील काही निवडणुका या अध्यक्ष पदांच्या आहेत. त्यानुसार लातूर (Latur), जालना (Jalna), अमरावती ( Amravati), वर्धा आदी जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी (Latur Zilla Parishad Presidential Election Results 2020) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (6 जानेवारी 2020) झाली. या मतमोजणीत शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि राष्ट्रीय काँग्रेस (National Congress) प्रणित महाविकाआघाडी (Maha Vikas Aghadi)  विरुद्ध भारतीय जनता पक्ष (bjp) आणि त्यांचे इतर मित्रपक्ष असा सामना रंगला. शिवाय स्थानिक आघाड्या आणि गटांनीही या निवडणुकीत नशिब आजमावत रंगत आणली. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणी निकालानुसार काही ठिकाणचे गड कायम राखत भाजपने जिल्हा परिषदेत आपली सत्ता कायम राखली आहे. मात्र, काही ठिकाणी मात्र भाजपला धक्का मिळाला असून, महाविकासआघाडी पुन्हा एकदा सत्तेवर स्वार झाली आहे. नजर टाकूया आज जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक निकालांवर

वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक निकाल

वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत भाजपने बाजी मारली. इथे भाजप शिवसेनेचा पाठिंबा घेतना दिसले. त्याचा परिणाम म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर भाजपचेच उमेदवार निवडूण आले. इथे सरिता विजय गाखरे अध्यक्ष पदावर तर, वैशाली जयंत येरावार या उपाध्यक्ष म्हणून निवडूण आल्या. अध्यक्षपदी सरिता गाखरे तर उपाध्यक्षपदी वैशाली येरावार प्रत्येकी 34 मतांसह विजयी झाल्या. तर त्यांच्या विरोधात अध्यक्षपदासाठी मैदानात असलेल्या काँग्रेसच्या उज्ज्वला देशमुख आणि उपाध्यक्षपदासाठी बसपाचे उमेश जिंदे यांना प्रत्येकी 18 मतं मिळाली.

वर्धा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल

एकूण 52 सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत भाजप 31, रिपाई 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 13, काँग्रेस आणि बसपा प्रत्येकी 2, शेतकरी संघटना 1 असे संख्याबल आहे.

जालना जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक

माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रात मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांच्या जालना जिल्ह्यात भाजपला जोरदार झटका बसला. इथे महाविकाआघाडी पॅटर्न यशस्वी झाला. त्यामुळे भाजपला सत्तेतून बाहेर पडावे लागले. महाविकासआघाडीच्या वतीने उभे असलेले शिवसेना उमेदवार उत्तम वानखेडे आणि उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. इथे पुरेसे संख्यबळ नसल्याने भाजपने निवडणुकीतून माघार घेतली. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासाठी दुपारी एक वाजे पर्यंत असलेल्या मुदतीत भाजपने अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे महाविकासआघाडीने इथे दणक्यात सत्ताप्रवेश केला.

अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक

अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीतही महाविकाआघाडी झेंडा फडकवताना दिसली. इथेही जालना पॅटर्नच पाहायला मिळाला. भाजपला नामुष्कीजनकरित्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपने इथेही उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे काँग्रेसचे बबलू देशमुख अध्यक्षपदी तर शिवसेनेचे विठ्ठलराव चव्हाण यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. (हेही वाचा, 'आम्ही आताच शपथ घेतलीय, अजून खिसे भरणे बाकी आहेत' काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचे वादग्रस्त विधान)

अमरावती जिल्हा परिषद पक्षीय बलाबल

अमरावती जिल्हा परिषदेत एकूण 57 जागांपैकी भाजप 13, काँग्रेस 26, राष्ट्रवादी काँग्रेस 5, शिवसेना 3, भाजप 13, प्रहार 5, युवा स्वाभिमान 2, , बसपा-लढा-अपक्ष असे प्रत्येकी 1 अशी सदस्यसंख्या आहे. त्यामुळे भाजपकडे आवश्यक संख्याबळ नाही हे स्पष्ट दिसत होते.

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. एकेकाळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मजबूत तटबंदी असलेली काँग्रेसची गडी म्हणून लातूर जिल्हा परिषद ओळखली जात असे. मात्र, विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर इथली समिकरणं बदलली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत भाजपने बाजी मारली. इथे, भाजपचे राहूल केंद्रे विजयी झाले असून उपाध्यक्षपदी भाजपच्या भारतबाई सोळुंके विजय झाला.

या वेळी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राजकारण भलतेच उलटेपालटे होताना दिसले. काही ठिकाणी सत्ताधारी विरोधक यांची हातमिळवणी तर, काही ठिकाणी विरोधक विरोधक, तर काही ठिकाणी सत्ताधारी-सत्ताधारी असे काहीसे नैसर्गिक-अनैसर्गिक मैत्री पाहायला मिळाली. स्पष्ट सांगायचे तर, काही ठिकाणी एकेकाळचे मित्र आणि आताचे विरोधक शिवसेना भाजप एकत्र दिसले.