अतिक्रमण हटवलं म्हणून पोलिसाचंच घर पेटवलं; कोल्हापूर मधील धक्कादायक घटना
फोटो सौजन्य- Pixabay

कोल्हापूर (Kolhapur) मधील गारगोटी (Gargoti) परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समजत आहे. अतिक्रमण हटवल्याच्या रागातून काही समाजकंटकांनी चक्क कारवाई करणाऱ्या पोलिसांचे घर पेटवल्याचे समजत आहे. पोलीस निरीक्षक संजय पतंगे (Sanjay Patange)  यांनी मागील काही दिवसांपूर्वी अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करत काही अनधिकृत दुकाने हटवली होती, यावेळी दुकानाच्या मालकाकडून त्यांना धमकावले सुद्धा गेले होते, त्यांनतर काल मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पतंगे यांच्या घराला  रॉकेल ओतून आग लावण्यात आली. याप्रकरणी सुभाष देसाई (Subhash Desai) या संशियत व्यक्तीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करायला आलेल्या पोलिसांना बघून तरुणींनी गच्चीवरून मारली उडी; जागीच मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, भुदरगड पोलीस कर्मचारी निवासस्थानाच्या आवारात सुभाष देसाई या व्यक्तीने अतिक्रमण करून दुकानाचा गाळा सुरु केला होता. हे अतिक्रमण संजय पतंगे यांनी काढले होते. संशयित सुभाष देसाई याने कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती, तसेच रॉकेलचा कॅनही आणून ठेवला होता. मंगळवारी रात्री त्यानं पोलीस कर्मचारी निवासस्थानातील निरीक्षक पतंगे यांच्या मोटारीवर रॉकेल ओतून ती पेटवून दिली. तसेच पतंगे यांच्या घरावरही रॉकेल ओतून ते पेटवून दिले. आगी मुळं घराच्या काचा फुटल्या तसेच आतील फर्निचरला सुद्धा आग लागून नुकसान झाले आहे.या घटनेनंतर संशयित देसाई अंधाराचा फायदा घेत पसार झाला होता.

दरम्यान, बुधवारी सकाळी महागाव येथील त्याच्या बहिणीच्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, देसाई हा गुंड प्रवृत्तीचा आहे. मात्र या विरोधात नागरिकांनी तक्रारी दिल्यास कारवाई करता येईल, असे अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले आहे.