Aurangabad Train Accident: औरंगाबाद येथील रेल्वे अपघाताबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र मुख्य सचिव आणि औरंगाबाद जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बजावली नोटीस
National Human Rights Commission (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आज झालेल्या रेल्वे अपघातात 16 स्थलांतरित कामरागांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. यामुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करणयात येत आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत कामगारांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर औरंगाबाद येथील रेल्वे अपघातबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने, महाराष्ट्र मुख्य सचिव आणि औरंगाबाद जिल्हा दंडाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. जालना मधील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी घरी परत जाणयाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे कामगार रात्रभर चालत करमाडपर्यंत पोहचल्याने थकले होते. त्यामुळे त्यांनी रेल्वे रुळांवर झोपण्याचा विचार केला असता आज सकाळी पहाटेच्या वेळी मालवाहून नेणाऱ्या मालगाडीने त्या 16 जणांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने एक विधान करत असे म्हटले आहे की, रेल्वे अपघाताची घटना ही परभणी-मनमाड सेक्शनच्या बदनापुर आणि करमाड रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. यावेळी रेल्वे रुळांवर 19 जण झोपले असता हा अपघात घडला आहे. परंतु मालगाडीच्या चालकाने रेल्वे रुळांवर झोपलेल्या नागरिकांना पाहून हॉर्न वाजवला आणि गाडी थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Aurangabad Train Accident: महाराष्ट्र सरकारकडून औरंगाबाद रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर)

दरम्यान, 24 मार्चला लॉकडाउनचे आदेश जाहीर केल्यानंतर विविध राज्यात मोठ्या प्रमाणात कामगार आणि मजूर वर्ग अडकून पडला होता. त्यांचे हातावर पोट असल्याने लॉकडाउनच्या काळात उत्पन्न न मिळण्याच्या विचाराने त्यांनी आपला घरी पायी जाण्याचा विचार केला होता. मात्र केंद्र सरकारकडून कामगारांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. तर आज औरंगाबाद मधील रेल्वे अपघाताप्रकरणी रेल्वे मंत्रालयाने यासंबंधित चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे.