धक्कादायक! 1 लिटर दुधात एक बादली पाणी ओतून 85 विद्यार्थ्यांना दिले मध्यान्ह भोजन; प्रशासनाकडू चौकशीचे आदेश
मध्यान्ह भोजन (Photo Credit : ANI)

सोनभद्र: सरकारी शाळांमधील (Government school) मुलांच्या मिड-डे जेवणाच्या (Midday Meal) अनेक तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. कधी विद्यार्थ्यांना वरणाच्या नावाखाली हळद मिसळलेले पाणी दिले जाते, तर कधी मीठ आणि भाकरी दिली जाते. कधीकधी मेनू चार्ट असूनही, आठवडाभर फक्त खिचडी दिली जाते. मिड-डे जेवणानंतर मुले आजारी पडल्याचे शेकडो अहवाल आपल्याला आढळतील. याबाबत उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार होत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. अशात एक लिटर दुधात एक बादली पाणी ओतून ते जवळजवळ 85 विद्यार्थ्यांना दिल्याची घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र (Sonbhadra) जिल्हा स्थित कोटा गावच्या सलाई बनवा प्राथमिक शाळेत ही घटना घडली आहे. इथे बुधवारी मुलांना खिचडी आणि दुध दिले जाते. जे जेवण 85 विद्यार्थ्यांना दिले जाणार होते. मध्यान्ह भोजनाच्या आधी इथल्या कर्मचाऱ्यांनी 1 लिटर दुधात तब्बल एक बादली पाणी ओतले व ते मुलांना देण्यात आले. सध्या या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत सोनभद्रचे सहाय्यक मूलभूत शिक्षणाधिकारी यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, दोषींवर कारवाई केली जाईल. (हेही वाचा: भयंकर! शाळेच्या Midday Meal मध्ये आढळला साप, पालकांकडून संताप व्यक्त)

घटनेनंतर बेसिक एज्युकेशन ऑफिसर गोरखनाथ पटेल म्हणाले की. 'मिड-डे जेवणात प्रत्येक मुलाला ठरवलेल्या निकषांवर आधारित 150 मिली दुध मिळणे गरजेचे आहे. मात्र जेव्हा आम्हाला यां घटनेची माहिती त्यानंतर आम्ही दुसरे दुध मागवून त्याचे मुलांना वाटप केले.' उत्तर प्रदेशमधील मिड डे जेवणात मुलांचे असे हाल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मिरजापूर जिल्ह्यात मुलांना भाकरीसोबत फक्त मीठ दिले गेले होते. याप्रकरणी कारवाई करण्याऐवजी या प्रकरणाचा खुलासा करणार्‍या पत्रकारविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.