Child Dies In Car | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

लग्न समारंभात सहभागी होण्याची हौस भागवत असताना एका दाम्पत्याचा संतापजनक निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. या जोडप्याने आपल्या तीन वर्षांच्या मुलीला कारमध्येच ठेवले (Kota Child Dies In Car) आणि त्यांनी लग्नसमारंभास हजेरी लावली. धक्कादायक म्हणजे या मुलीचा कारमध्येच गुदमरुन मृत्यू (Child Locked In Car Dies Of Suffocation) झाला. ही घटना राजस्थान राज्यातील कोटा येथे बुधवारी संध्याकाळी घडली. घटनेनंतर दाम्पत्याने दावा केला की, या मुलीला कारमध्ये जाणीवपूर्वक ठेवण्यात आले नव्हते तर, हे जोडपे बाळाला कारमध्येच विसरून लग्नाला गेले होते. घडलेल्या घटेनेपेक्षा दाम्पत्याने सांगितलेल्या कारणावरुन अधिक संताप निर्माण झाला आहे.

वडिलांचा गैरसमज

खतोली पोलिस स्टेशनचे एसएचओ बन्ना लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे वडील प्रदीप नगर हे पत्नी आणि दोन मुलींसह एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर आई आणि मोठी मुलगी कारमधून बाहेर पडली आणि गोरविका (पीडिता) तिच्या वडिलांसोबत कारमध्येच राहीली. दोन्ही मुली त्यांच्या आईसोबत कार्यक्रमस्थळी गेल्या आहेत असे समजून, प्रदीप नगर हे वाहन पार्क करण्यास निघाले. आपली मुलगी कारमध्ये राहिल्याचे त्यांच्या लक्षातच आले नाही. कार्यक्रमस्थळी गेल्यावर पाहिले असता एक मुलगी गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुलगी कारमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी एकच धावपळ केली. मात्र, तोवर सर्व संपले होते. (हेही वाचा, Land Cracks In Barmer: राजस्थानमध्ये 1.5 एकर शेताखालची जमीन 70 फूट खोल खचली, धोकादायक परिसर लोकांसाठी बनाला Selfie Point)

पालक दोन तासांनी भानावर

पोलिसांनी सांगिलेकी, पीडितेचे पालक लग्नसमारंभात अतिशय तल्लीन झाले. विविध अभ्यांगतांशी संवाद साधण्यात ते इतके गर्क झाले की, त्यांना आपल्या बाळाची यत्किंचितही आठवण राहिली नाही. कार्यक्रमात सुमारे दोन तास मग्न राहिल्यानंतर त्यांना भान आले. त्यांनी परस्परांकडे बाळाबद्दल विचारणा केली आणि मग त्यांना लक्षात आले की, बाळ तर कारमध्येच विसरले आहे. त्यांनी तातडीने पार्किंग परिसरात धाव घेतली. त्यांना बाळ सापडले पण ते मृतावस्थेत होते.

पालकांनी बाळाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली मात्र बाळाचे शवविच्छेदन करणे किंवा तक्रार घेण्यास नकार दिला. घडल्या घटनेबद्दल परिसरात हळगळ व्यक्त होत आहे. तसेच, या घटनेमुळे विवाहाच्या आनंदावरही काही काळ विरजण पडल्याची भावना उपस्थितांध्ये निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अशी घटना घडणे म्हणजे पालकांचा टोकाचा निष्काळजीपणा असल्याचा संताप काही वडीलधाऱ्या मंडळींनी व्यक्त केला.