
भारतीय जनता पक्ष (BJP) महिलांना सिंदूर (Sindoor) वितरित करण्याची योजना आखत आहे. ही योजना मोदी सरकारच्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, तथ्यपडताळणीमध्ये आढळून आले की, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (पीआयबी) फॅक्ट-चेकिंग (PIB Fact Check) युनिटने शुक्रवारी व्हायरल दाव्यांचे खंडन केले आहे. सरकारचा असा कोणताच उद्देश नसल्याचेही पीआयबीने म्हटले आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्ती निमित्त अशा प्रकारची मोहीम राबवली जाणार असल्याच्या बातम्या व सोशल मीडिया पोस्ट्स फेक असल्याचे PIB ने सांगितले.
सोशल मीडियाद्वारे खोटा प्रचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेल्या 9 जूनपासून भाजपकडून देशभरात एक मोठी जनसंपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे एनडीए सरकारच्या 11 वर्षांतील कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, असा दावा सोशल मीडियाद्वारे केला जात होता.
पीआयबीकडून तत्काळ स्पष्टीकरण
दरम्यान, ट्विटर (X) वर PIB च्या अधिकृत पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले की, "मोदी 3.0 च्या वर्षपूर्ती निमित्त काही निर्णय घेण्यात आले आहेत, अशा प्रकारच्या काही सोशल मीडिया पोस्ट्स आणि वृत्तमाध्यमांमधील बातम्या चुकीच्या आहेत. अशा कोणत्याही निर्णयाची अधिकृत घोषणा झालेली नाही."
भाजपने अधिकृतपणे मोहीमेची रूपरेषा जाहीर केलेली नाही
भाजपने अद्याप या मोहिमेची पूर्ण माहिती दिलेली नसली, तरी पक्षातील नेत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे केंद्रीय मंत्र्यांकडून आणि खासदारांकडून पदयात्रा काढण्यात येणार आहेत.
ही मोहीम ‘ऑपरेशन सिंदूर’, जातिनिहाय जनगणनेवरील सरकारची भूमिका आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
पीआयबीकडून तथ्य पडताळणी
Some social media posts and media reports are claiming of various decisions to mark anniversary of Modi 3.0#PIBFactCheck:
➡️This claim is #Fake
➡️ Rely only on official sources for accurate information pic.twitter.com/e6sYqSY2ii
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 30, 2025
भाजप खासदार संबित पात्रा यांचा आरोप – फेक न्यूज पसरवली जात आहे
PIB च्या स्पष्टीकरणाआधीच, भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी हे वृत्त फेक न्यूज असल्याचे सांगितले. त्यांनी विरोधकांवर मुद्दाम खोटा प्रचार करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा आरोप केला.
“हे देशाच्या सुरक्षाविषयक कारवाईचे आणि ऑपरेशन सिंदूरसारख्या गंभीर मोहिमेचे अपमानकारक विकृतीकरण आहे. ही खोटी माहिती पसरवून देशातील दहशतवादाविरुद्धच्या कारवाईला कमी लेखण्याचा लाजीरवाणा प्रयत्न आहे,” असे पात्रा म्हणाले.
ममता बॅनर्जी यांचा मोदींवर हल्लाबोल
दरम्यान, सिंदूर वाटपाच्या चर्चेने राजकीय वातावरण तापवले असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली. एका जाहीर भाषणात त्या म्हणाल्या, “प्रत्येक महिलेला स्वतःचा सन्मान असतो. सिंदूर ही गोष्ट फक्त नवऱ्यांकडूनच स्वीकारली जाते… तुम्ही सगळ्यांचे नवरे नाही. आधी स्वतःच्या पत्नीला सिंदूर द्या, मग इतर महिलांबद्दल बोला.”
दरम्यान, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची वर्षपूर्ती साजरी करताना भाजपकडून विविध यशस्वी योजनांचा प्रचार केला जाणार आहे. मात्र सोशल मीडियावरून पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्या आणि अपप्रचारामुळे खरे-खोट्याचा संभ्रम निर्माण होत आहे. PIB कडून सध्या तरी सिंदूर वाटप मोहिमेसंबंधी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.