Mehangai Chaupals: महागाईविरोधात Congress 17 ते 23 ऑगस्ट करणार आंदोलन; देशभरात लावणार 'महंगाई चौपाल'
Congress | (File Image)

देशातील महागाईविरोधात काँग्रेस (Congress) मोठे आंदोलन उभारणार आहे. 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान कॉंग्रेस सर्व विधानसभा मतदारसंघातील मंडया, किरकोळ बाजार आणि इतर ठिकाणी 'महंगाई चौपाल' (Mehangai Chaupals) लावणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या आंदोलनाची सांगता 28 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणाऱ्या 'महांगाईपे हल्ला बोल' रॅलीने होईल. यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी काँग्रेसने महागाईविरोधात जोरदार निदर्शने केली होती. त्या दिवशी राहुल गांधींसह काँग्रेसचे अनेक नेते काळे कपडे परिधान करून निदर्शनात सहभागी झाले होते. हा मुद्दा संसदेतही मांडण्यात आला होता.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या आंदोलनाची माहिती दिली. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी काँग्रेसच्या 5 ऑगस्टच्या आंदोलनाचा उल्लेख 'काळी जादू' असा केला. गगनाला भिडणारी महागाई आणि बेरोजगारी रोखण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचे यावरून दिसून येते. आगामी आठवड्यात काँग्रेस महागाई आणि बेरोजगारीविरोधातील लढा अधिक तीव्र करणार आहे. महागाई चौपाल 28 ऑगस्ट रोजी रामलीला मैदानावर 'महांगाईपे हल्ला बोल' रॅलीने संपले. या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संबोधित करणार आहेत.

रामलीला मैदानावरील रॅलीला पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही संबोधित करणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस या जनविरोधी धोरणांबाबत लोकांमध्ये जागृती करत राहील आणि भाजप सरकारवर चुकीची धोरणे बदलण्यासाठी दबाव वाढवेल. काळे कपडे घालण्याच्या मुद्द्यावरून काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. या आंदोलनाची पंतप्रधान मोदींनी बुधवारी खिल्ली उडवली. (हेही वाचा: 'काळी जादू, अंधश्रद्धेची भलावण थांबवा पंतप्रधान पदाची बेईज्जती करणे बंद करा'; राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर प्रहार)

मोदी म्हणाले होते की, 5 ऑगस्टला काही लोकांनी काळे कपडे घालून काळी जादू पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यांना असे वाटते की काळे कपडे परिधान केल्याने त्यांच्या निराशेचा काळ संपेल, परंतु त्यांना हे माहित नाही की जादूटोणा, काळी जादू आणि अंधश्रद्धेमध्ये गुंतून ते लोकांमध्ये स्वतःप्रती विश्वास निर्माण करू शकत नाहीत. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधानांनी महागाई आणि बेरोजगारीवर उत्तर द्यावे, अंधश्रद्धेवर बोलून पदाची प्रतिष्ठा कमी करू नये.