Elderly Population in India: देशातील वृद्धांची लोकसंख्या 2050 पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा; व्यक्त केली जात आहे चिंता, आरोग्यसेवा-पेन्शनमध्ये गुंतवणूक आवश्यक

भारतातील वृद्ध लोकांची लोकसंख्या 2050 पर्यंत दुप्पट होऊन 34 कोटी 60 लाखांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या गरजेनुसार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आताच गुंतवणूक केली नाही, तर भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Elderly Population in India: देशातील वृद्धांची लोकसंख्या 2050 पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा; व्यक्त केली जात आहे चिंता, आरोग्यसेवा-पेन्शनमध्ये गुंतवणूक आवश्यक
Old Age Representational Image (Photo Credits: Pixabay)

Elderlyn Population in India: केंद्र सरकारचे 2047 पर्यंत भारत विकसित करण्याचे लक्ष्य आहे. या दिशेने धोरणात्मक काम जोरात सुरू आहे. पण, सरकारच्या ध्येयानुसार भारत विकसित होईल, तोपर्यंत काही आव्हानेही उभी राहणार आहेत. यापैकी एक म्हणजे देशातील ‘वृद्धांची लोकसंख्या’. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाच्या भारतीय युनिट 'UNFPA-INDIA’ च्या प्रमुख आंद्रिया वोजनार म्हणतात की 2050 पर्यंत भारतातील वृद्ध लोकसंख्या दुप्पट होऊ शकते. अशा परिस्थितीत वृद्धांसाठी विशेष धोरणे बनवण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना आरोग्य सेवा, घर आणि पेन्शन मिळू शकेल. हे विशेषतः वृद्ध स्त्रियांना आवश्यक असेल, ज्या वृद्धापकाळात एकाकी होऊ शकतात. गरिबी ही त्यांच्यासाठी मोठी समस्या असेल.

जागतिक लोकसंख्या दिनाच्या काही दिवसांनंतर (11 जुलै) वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना, वोजनर यांनी भारत शाश्वत विकासाला गती देण्यासाठी प्राधान्य देत असलेल्या लोकसंख्येच्या ट्रेंडची रूपरेषा सांगितली. यामध्ये तरुण लोकसंख्या, वृद्ध लोकसंख्या, शहरीकरण, स्थलांतर आणि हवामान बदल यांचा समावेश आहे. देशासमोरील ही अनोखी आव्हाने आहेत, परंतु त्यांचे संधींमध्ये रूपांतरही होऊ शकते.

भारतातील वृद्ध लोकांची लोकसंख्या 2050 पर्यंत दुप्पट होऊन 34 कोटी 60 लाखांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या गरजेनुसार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आताच गुंतवणूक केली नाही, तर भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: आरोग्यसेवा, गृहनिर्माण आणि पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक वाढवण्याची तीव्र गरज आहे.

सध्या भारतात 10 ते 19 वयोगटातील लोकांची संख्या 25 कोटींहून अधिक आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीमध्ये गुंतवणूक केल्यास या लोकसंख्याशास्त्रीय क्षमतेचा उपयोग केला जाऊ शकतो. यामुळे देशाला सतत प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यास मदत होईल. भारतातील शहरी लोकसंख्या 2050 पर्यंत 50 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. अशा परिस्थितीत वायू प्रदूषणासह इतर पर्यावरणीय समस्याही गंभीर बनू शकतात. याला सामोरे जाण्यासाठी, स्मार्ट शहरे, मजबूत पायाभूत सुविधा आणि परवडणारी घरे तयार करणे देखील महत्त्वाचे आहे.  वोजनार यांच्यानुसार, शहरी नियोजनाने महिलांचा विचार केला पाहिजे. लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी आणि जीवनाचा एकूण दर्जा सुधारण्यासाठी सुरक्षिततेच्या गरजा, आरोग्य सेवा आणि शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये प्रवेश सुनिश्चित करणे गरजेचे आहे.

चिंताजनक बाब-

पुढील 25 वर्षात देशाच्या लोकसंख्येतील 60 वर्षांवरील लोकांची संख्या 20.8 टक्क्यांवर पोहोचेल, म्हणजेच प्रत्येक पाचवा व्यक्ती वृद्ध असेल. अहवालानुसार, 2022-2050 दरम्यान एकूण लोकसंख्या केवळ 18 टक्क्यांनी वाढेल, परंतु वृद्ध लोकसंख्या 134 टक्क्यांनी वाढेल. 2022 पर्यंत, वृद्ध लोकसंख्या 14.9 कोटी (10.5 टक्के) होती आणि प्रत्येक 100 कार्यरत लोकांमागे 16 वृद्ध अवलंबून होते. वृद्धांची संख्या वाढल्याने हे प्रमाण आणखी बिघडेल. (हेही वाचा: Economic Survey 2024: सरकारी उपाययोजना आणि RBI च्या हस्तक्षेपामुळे 5.4% वर राहिली, आर्थिक पाहणी अहवालात केंद्राचा दावा)

दरम्यान, चीनमधील वृद्ध लोकसंख्या ही एक गंभीर समस्या बनली आहे. चीनच्या कम्युनिस्ट सरकारने 1980 मध्ये लोकसंख्या कमी करण्यासाठी कडक लोकसंख्या नियंत्रण कायदे लागू केले होते. त्यानुसार चीनमधील बहुतांश कुटुंबांना एकच मूल होऊ शकते. त्यामुळे चीनची लोकसंख्या नियंत्रित झाली, पण तरुण लोकसंख्या वृद्धांची जागा घ्यायला तयार झाली नाही.

(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2024 09:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).