COVID-19 Third Wave: 'या' राज्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; नियमांचे पालन न करणे पडेल महागात
Representational Image | (Photo Credits: PTI)

देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असताना आता पुन्हा एकदा रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका कायम असून ही लाट गंभीर असेल, अशी माहिती अनेक रिपोर्ट्समधून समोर आली आहे. त्यातच महाराष्ट्र (Maharashtra), केरळ (Kerala) यांसारख्या राज्यांमध्ये रुग्णवाढ मोठ्या प्रमाणावर होत आहे. याशिवाय मिझोरम (Mizoram), तामिळनाडू (Tamil Nadu), कर्नाटक (Karnataka) या राज्यांमध्येही कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन न करणे महागात पडणार आहे.

ही परिस्थिती आणि पुढील दोन महिन्यांत येणारे सण-उत्सव लक्षात घेऊन केंद्र सरकाने नियमांचे पालन करण्याचा इशारा राज्यांना दिला आहे. काही राज्यांत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने येणारे सण-उत्सव साधेपणाने साजरे करा. नियमांचे पालन करा, असा इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. दरम्यान, जाणून घ्या राज्यांमधील कोरोना परिस्थिती... (केरळ-महाराष्ट्रातील Covid-19 प्रकरणांनी केंद्राची वाढवली चिंता; राज्यांना लिहिले पत्र, दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी उपयोजना करण्याचा सल्ला)

महाराष्ट्र:

राज्यात शनिवारी कोरोनाचे 4,831 नवे रुग्ण समोर आले असून 126 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 51,821 सक्रीय रुग्ण आहेत. तर मुंबईमध्ये 391 नवे कोरोना रुग्ण समोर आले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केरळ:

केरळमध्ये शनिवारी सलग चौथ्या दिवशी 30 हजारहून अधिक नवे रुग्ण समोर आले आहेत. 31,265 नव्या रुग्णांसह 153 जणांचा मृत्यू झाला आहे. 2,04,896 सक्रीय रुग्ण आहेत.

मिझोरम:

मिझोरम मध्ये 888 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 10 ऑगस्टनंतर रुग्णसंख्या वाढू लागली आहे. (Covid-19 Third Wave: देशात ऑगस्ट महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट; ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या शिगेला- Reports)

तामिळनाडू:

तामिळनाडूमध्ये 1,551 नवे कोरोनाग्रस्त समोर आले असून 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोयंबटूरहून 230, चेन्नईहून 182, चेंगलपेटहून 122 आणि इरोड हून 115 रुग्ण समोर आले आहेत. सध्या राज्यात 17,559 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कर्नाटक:

कर्नाटकमध्ये शनिवारी कोरोनाचे 1229 नवे रुग्ण समोर आले असून 13 मृतांची नोंद झाली आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्या18,897 इतकी आहे.

दरम्यान, मागील 24 तासांत देशांत 45,083 नवे रुग्ण आढळून आले असून 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 35,840 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 3,68,558 सक्रीय रुग्ण आहेत.