Air India चे विमान धावपट्टीवरून घसरले; अपघात टळल्याने वाचले 55 प्रवाशांचे प्राण
Air India plane (PC - ANI)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील जबलपूर (Jabalpur) येथील डुमना विमानतळावर आज एअर इंडियाचे विमान (Air India Plane) अपघातातून बचावले. दिल्लीहून येणारे हे विमान विमानतळावर उतरत असताना अनियंत्रित झाले. त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. नंतर वैमानिकांच्या प्रसंगावधानाने हे विमान पुन्हा धावपट्टीवर आणण्यात आले. विमानात एकूण 55 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

दिल्लीहून जबलपूरला येणारे एअर इंडियाचे विमान ATR-72 दुपारी जबलपूरच्या डुमना विमानतळावर पोहोचले. धावपट्टीवर उतरत असतानाच विमान धावपट्टीवरून नियंत्रणाबाहेर गेले. त्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली आणि प्रवासी घाबरले. (वाचा- कुस्तीपटू Sushil Kumar तिहार तुरुंगात कैद्यांना देत आहे फिटनेस आणि कुस्तीचे प्रशिक्षण)

दरम्यान, वैमानिकांच्या प्रसंगावधानाने विमान कसेतरी धावपट्टीवर आणण्यात आले. विमानतळावर अपघाताची माहिती मिळताच विमानतळ प्राधिकरण आणि अग्निशमन दलाचे लोक घटनास्थळी पोहोचले. यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमान धावपट्टीवरून कसे घसरले आणि अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे.